Scam in ICICI Bank : एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे लोकांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. पैशांसाठी सर्वात सुरक्षित जागा म्हणजे बँक आहे असा लोकांचा विश्वास असतो. परंतु, हा विश्वास तुटला आहे. (Bank) राजस्थानमधील कोटा येथील एका खाजगी बँकेत काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याने या विश्वासाचा फायदा घेत कोट्यवधी रुपये लुटले आहेत.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कोटा येथील एका आयसीआयसीआय बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या साक्षी गुप्ताने 2020 ते 2023 दरम्यान बँकेच्या ‘युजर एफडी लिंक’चा गैरवापर करून ग्राहकांच्या 110 खात्यांमधून एकूण 4.58 कोटी रुपये काढले. तिने हे पैसे शेअर बाजारात गुंतवले. पण तिला मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यानंतर ज्या खात्यांमधून पैसे काढले गेले त्या खात्यांमध्ये ती पैसे जमा करू शकली नाही.
जेव्हा एक ग्राहक त्याच्या मुदत ठेवीची माहिती घेण्यासाठी बँकेत पोहोचला तेव्हा ही फसवणूक उघडकीस आली. तपासात असे दिसून आले की त्याच्या खात्यातून पैसे काढले गेले आहेत. यानंतर, बँकेने 18 फेब्रुवारी रोजी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. साक्षी गुप्ता हिला तिच्या बहिणीच्या लग्नादरम्यान पोलिसांनी अटक केली आणि ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
नागरिकांनो, EPFO, टॅक्स अन् HDFC बँकेचे 4 मोठे नियम होणार लागू; जाणून घ्या सर्वकाही
पोलीस तपासात असंही दिसून आलं की, साक्षीने ग्राहकांचे मोबाईल नंबर देखील बदलले होते जेणेकरून कोणतेही मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचू नयेत. तिने तिच्या कुटुंबातील सदस्यांचे मोबाईल नंबर ग्राहकांच्या खात्यांशी जोडले आणि ग्राहकांना कोणताही सुगावा लागू नये म्हणून ओटीपी सिस्टम हॅक करून ती तिच्या सिस्टममध्ये ट्रान्सफर केली.
घोटाळ्याची बातमी समोर आल्यानंतर बँकेत पोहोचलेले ग्राहक महावीर प्रसाद म्हणाले, मी ऐकले की साक्षी गुप्ताने 4 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. मी माझे पैसे सुरक्षित आहेत की नाही हे तपासण्यासाठी बँकेत आलो होतो. पण, माझी फसवणूक झाली आता बँकांवरही विश्वास उरलेला नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
आमच्या ग्राहकांचे हित हे आमच्यासाठी सर्वोच्च आहे. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच, आम्ही तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. अशा प्रकारच्या गैरप्रकारांबाबत बँकेची भूमिका स्पष्ट असून, आम्ही कोणतीही तडजोड करत नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबीत करण्यात आलं आहे. या घटनेत प्रभावित झालेल्या ग्राहकांचे प्रामाणिक दावे निकाली काढण्यात आले असून, त्यांना आवश्यक ती मदत देण्यात आली आहे असंही बँकेच्या मॅनेजमेंटने सांगितलं आहे.