Download App

Manipur : हे सहन केलं जाणार नाही! तुम्ही कारवाई करा अन्यथा… CJI चंद्रचूड यांनी मोदी सरकारला झापले

नवी दिल्ली : जातीय दंगलींमुळे मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालल्याचे चित्र आहे. अशात मणिपूरमधील एका व्हायरल व्हिडीओने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. माणुसकीला लाज आणणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची रस्त्यावरुन धिंड काढण्यात आल्याचे दिसून येत आहे. काही पुरुष हे 2 असहाय्य महिलांना विवस्त्र करुन त्यांच्या शरिराला अत्यंत घृणास्पदरित्या स्पर्श करत आहेत आणि त्यांना शेतात खेचत असल्याचं दिसून येत आहे. कुकी समुदायातील या महिलांवर सामुहिक अत्याचार करत त्यांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याचं टाइम्स नाऊनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवरुन आता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. लोकशाही असलेल्या देशात अशी घटना सहन केली जाणार नाही. जातीय कलहाच्या क्षेत्रात महिलांचा एक साधन म्हणून वापर करणे ही घटनेच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी घटना आहे. जे व्हिडिओ समोर आले आहेत त्यामुळे आम्ही खूप व्यथित झालो आहोत. मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तात्काळ यात लक्ष घालावे. सरकारने कारवाई केली नाही तर आम्ही करू, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे. (Supreme Court directs Union and State government to take steps against the videos of women being stripped and paraded in Manipur)

आज मेरा हृदय पीड़ा और क्रोध से भरा हुआ है :

दरम्यान, या घटनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझ्या हृदयात वेदना आणि संताप आहे. मणिपूरमधील घटना आपल्यासमोर आली आहे ती कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी बाब आहे. पाप करणारे, गुन्हा करणारे कोण आहेत, ते त्यांच्या जागी आहेत. पण इभ्रत पूर्ण देशाची जात आहे.

मी सर्व मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करावा – विशेषत: महिलांच्या सुरक्षेसाठी वातावरण तयार करावे. महिलांच्या सुरक्षेसाठी कडक पावलं उचलावीत. ती राजस्थानची घटना असो, छत्तीसगडची असो किंवा मणिपूरची असो. या देशात कोणत्याही कोपऱ्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असु देत, राजकीय वादविवादाच्या पलिकडे जाऊन कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी. महिलांची सुरक्षितता ठेवली जावी. मी देशाला आश्वासन देतो की, मणिपूरमध्ये कोणत्याही दोषींना सोडले जाणार नाही. मणिपूरच्या मुलींसोबत जे घडले ते कधीही माफ न करणारे कृत्य आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Tags

follow us