Manipur Violence : हिंसाचाराच्या आगीत जळत असलेल्या मणिपुरात पुन्हा (Manipur Violence) एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मैतेई समाजातील काही नेत्यांना अटक झाली. यानंतर ठिकठिकाणी विरोध प्रदर्शने सुरू झाली आहेत. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने राज्यातील पाच जिल्ह्यांत पाच दिवसांसाठी इंटरनेट बंद केले आहे. या जिल्ह्यात गर्दी जमवण्यावरही मनाई आहे.
राजधामी इंफाळ भागात शनिवारी मैतेई समूहाचे पाच अरमबाई टेंगोल स्वयंसेवकांना अटक करण्यात आल्याची अफवा पसरली. यानंतर लगेचच तणाव वाढला. लोकांनी आंदोलन सुरू केले. याच दरम्यान पोलीस आणि आंदोलकांत धुमश्चक्री उडाली. या घडामोडींवर मणिपूर प्रशासनाने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. यामुळेही राज्यातील तणावात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Manipur Politics : मणिपूरमध्ये पुन्हा भाजप सरकार? 10 आमदारांनी घेतली राज्यपालांची भेट
माहितीनुसार एनआयएच्या पथकाने शनिवारी दुपारी मैतेई समूहाच्या पाच स्वयंसेवकांना ताब्यात घेतले होते. यानंतर येथील परिस्थिती बिघडण्यास सुरुवात झाली. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. शनिवारी रात्रीच इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थौबल, विष्णूपूर आणि काकचिंग या पाच जिल्ह्यांतील इंटरनेट बंद करण्यात आले होते. याबरोबरच व्हीपीएन नेटवर्क देखील बंद करण्यात आले.
प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की सार्वजनिक संपत्ती आणि जीविताहानी टाळण्यासाठी इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवेदनशील विष्णुपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर इंफाळ पूर्व आणि पश्चिम, थौबल, काकचिंग या जिल्ह्यांत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री 2 वाजता मणिपूर पोलिसांनी या घडामोडींना दुजोरा दिला. तसेच इंटरनेट प्रतिबंध, कर्फ्यू आणि प्रतिबंधात्मक आदेशांसंबंधित आदेशांची कॉपी एक्सवर टाकली आहे.
शनिवारी सायंकाळी येथे तणाव वाढला होता. अटकेची अफवा पसरताच ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली. या आंदोलनात एक पत्रकार आणि दोन नागरिक जखमी झाले. पश्चिम इंफाळ जिल्ह्यात क्वाकेथेल पोलीस स्टेशनवर संतप्त जमाव चालून आला. अटक केलेल्या लोकांना तत्काळ सोडून देण्याची मागणी केली. गर्दी पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी हवेत गोळीबार केला.