मुंबई : हिंदुत्वाचा वारसा मिळूनही उद्धव ठाकरे यांना ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचे गोडवे गावे लागत आहेत. त्यांनी शिवतीर्थावर काँग्रेस (Congress) धार्जिणी भूमिका घेत पुन्हा एकदा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांना तिलांजली दिली.हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनबद्दल बोलतील, असे वाटले होते, पण ते मूग गिळून गप्प बसले. कंत्राटीभरती सुरू केल्याबद्दल महाराष्ट्रातील तरुणांची माफी मागतील, अशी आशा होती, परंतु, त्यांना महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता जास्त आहे. महाराष्ट्राची जनता त्यांना सोडणार नाही, अशी टीका अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
काल (25 ऑक्टोबर) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा पार पडला. यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. याला बावनकुळे यांनी प्रत्तुत्तर दिले. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. (BJP state president Chandrashekhar Bawankule criticized Shiv Sena chief Uddhav Thackeray)
यावेळी बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याजवळ विकासाचा अजेंडा आणि विकासाचे व्हिजनही नाही. त्यांना कॉंग्रेस आणि शरद पवारांची वकिली करावी लागत आहे. शरद पवारांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ते आणखीच बिघडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कर्तृत्व संपूर्ण देशाने मान्य केले आहे. जनतेच्या मनात पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल कुटुंबप्रमुख ही भावना आहे व ते देखील जनतेला आपल्या कुटुंबाप्रमाणे मानतात. हेच शिल्लक सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दुखणे आहे. ‘माझं कुटुंब- माझी जबाबदारी’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना ते कळणार नाही, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षण देण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले होते. ते उद्धव ठाकरेंनी घालविले. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी थोडी वाट पाहावी, असे आवाहन यावेळी बावनकुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले.