Download App

Nana Patole : हे संवेदनशील नाही, गेंड्याच्या कातडीचे सरकार, शेतकरी मरत असतांना जनतेच्या पैशांवर पंचतारांकित मौजमजा!

  • Written By: Last Updated:

Nana Patole On Cabinet meeting : उद्यापासून (दि. 16) औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet meeting) होणार आहे. मराठवाड्यातील मंत्रिमंडळाची परंपरा महायुती सरकार मोडीत काढणार असल्याचं दिसतं. कारण, पंचतारांकित हॉटेलमध्ये एक-दोन नव्हे, तर मंत्र्यांसाठी शंभरहून अधिक खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. यावरूनच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे संवेदनशील नाही, तर गेंड्यांच्या कातडीचं सरकार आहे, कॅबिनेटवर कोट्यावधींची उधळपट्टी करणं हा दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यचा प्रकार असल्याची टीका पटोलेंनी केली.

नाना पटोले म्हणाले की, राज्यातील येड्यांच्या (EDA) सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली आहे. शेतकरी सुलतानी संकटाचा सामना करत आहे, मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, मराठा आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. मराठवाड्यासह राज्यात परिस्थिती एवढी गंभीर असताना मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांची जनतेच्या पैशातून अलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवली आहे. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीवर करोडो रुपये खर्च करणे म्हणजे मराठवाड्यातील दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, स्वत:ला संवेदनशील म्हणून घेणारे सरकार प्रत्यक्षात गेंड्याच्या कातडीचे आहे, अशी घणाघाती टीका पटोलेंनी केली.

सई ताम्हणकर मराठीतील बोल्ड अभिनेत्री 

ते म्हणाले, संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक घेऊन मराठवाड्यातील जनतेचे प्रश्न मार्गी लागत असतील तर त्याचे स्वागतच आहे. पण त्यासाठी श्रीमंती खाट कशाला हवा? यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीवेळी आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी सरकारी विश्रामगृहात मुक्काम केला होता. मात्र एकनाथ शिंदे हे संभाजीनगरच्या सर्वात महागड्या आलिशान तारांकित हॉटेलमध्ये राहणार आहेत. त्यांच्यासह उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही आलिशान हॉटेलमध्ये उत्तमोत्तम सुविधा केली आहे. जेवणाची एक थाळी दीड हजार रुपयांची आहे, अशा बातम्याही प्रकाशित झालेल्या आहेत.

पटोले म्हणाले, इतर अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीही हॉटेल व गाड्यांवर कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. हा बडेजाव करण्याची गरज नव्हती, साधेपणाने शासकीय विश्रामगृहात राहिले असते तर मराठवाड्याच्या जनतेच्या प्रश्नावर चर्चा करता आली नसती का? पण सरकारला दिखावा करण्याशिवाय काही करायचे नाही. मराठा आरक्षणाच्या बैठकीप्रमाणेच मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ संभाजीनगरात येणार, बैठक घेऊन बोलून रिकामे होणार आणि मराठवाड्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसून निघून जाणार, असा टोला पटोलेंनी लगावला.

मराठवाड्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यात खरीप पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना सरकारने अद्याप मदत केलेली नाही. सरकारने जाहीर केलेल्या कांद्याचे अनुदान अद्याप दिलेले नाही. ओबीसींसह मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारावरील वाढत्या खर्चामुळे सरकार कमी मानधनावर कंत्राटी कामगार नियुक्त करण्याचा निर्णय घेते, शासन आपल्या दारी म्हणत जनतेच्या पैशावर कार्यक्रम करून स्वत:ची जाहीरातबाजी करते. हे सरकार असंवेदनशील असून, जाहीरातबाजी, इव्हेंटबाजी व आता मंत्रिमंडळ बैठकीवर वारेमाप खर्च करणारे हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, असं पटोले म्हणाले.

Tags

follow us