कोल्हापूर : शिवसेना फूटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटावर तसेच शिंदे गटाच्या आमदारांवर सातत्याने शाब्दिक हल्लाबोल करत आहे. तसेच शिंदे गटाला मिंधे गट असा शब्दप्रयोग करत आहे. आता याच शब्दाचा वापर शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. उद्धव ठाकरे स्वतः मिंधे झाले आहे, अशी घणाघात टीका केसरकर यांनी केली आहे.
आज कोल्हापूर येथे दीपक केसरकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अत्यंत आक्रमक अशी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. पुढे बोलताना केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी बाळसाहेबांचा वारसा सोडला असून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा वारसा घेतल्याची जहरी टीकाही केसरकर यांनी केली आहे.
केसरकर म्हणाले की, मला एक दिवस पंतप्रधान करा, 370 कलम रद्द करतो, असं सांगणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा वारसा उद्धव ठाकरेंनी यांनी सोडून दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा गेला, आता त्यांनी काँग्रेसचा वारसा घेतला आहे.तसेच पुढे बोलताना उद्धव ठाकरेंना उद्देशून केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा, वंचित बहुजन आघाडीचा वारसाही चालवायचा असेल, तर तो चालवावा. दिवंगत शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युती निर्माण केली होती.
दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना केसरकर म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी संयम बाळगायला हवा, कारण ते स्वतःला आणि ठाकरे घराण्याला डॅमेज करत आहेत ते त्यांनी थांबवावे असा सल्लाही त्यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे. पहाटेच्या शपथविधीवर बोलण्यास केसरकर यांनी बगल दिली. मात्र, त्यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शरद पवार, अजित पवार, सुप्रियाताई यांच्याबद्दल कधीही वाईट बोलणार नसल्याचे ते म्हणाले.