Download App

कल्याणमधील भाजप-शिवसेना युतीतील वाद मिटताच श्रीकांत शिंदे पुन्हा अॅक्टिव, शनिवारी घेणार मेळावा

  • Written By: Last Updated:

Shrikant Shinde : कल्याणमध्ये भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात मिठाचा खडा पडला होता. आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार मान्य केला जाईल. तसेच मानपाडा पोलिस ठाण्यातून सक्तीच्या रजेवर पाठवलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे निलंबित होत नाही, तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव भाजपने केला होता. हा वाद केंद्रापर्यंत पोहोचला. अखेर काल सह्याद्रीवर झालेल्या बैठकीनंतर या वादावर पडदा पडला असून खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे सक्रीय झाले. (Dispute between BJP-Shiv Sena resolved, MP Shrikant Shinde active again)

श्रीकांत शिंदे यांनी कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा शनिवारी सकाळी दहा वाजता कल्याणमधील आचार्य अत्रे सभागृहामध्ये संपन्न होणार आहे. या वादा नंतर पुन्हा श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेमध्ये सक्रिय झालेले दिसून येतील असं सांगण्यात येतंय.

श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद सुरू झाला होता. या लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केला. शिंदे गटाच्या विरोधात उघड भूमिका घेत शिवसेनेला कोणतेही सहकार्य करणार नाही, असा ठराव भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यावर जाणूनबुजून विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामागे शिंदे गटाचा हात असल्याचा दावा भाजपने केला. त्यामुळं स्थानिक भापजने शिंदे गटाशी असहकाराची भूमिका घेतली होती.

सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? देवेंद्र फडणवीसांची टीका 

नेमक्या याच कारणामुळं संतापलेल्या श्रीकांत शिंदे यांनी थेट आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. डोंबिवलीतील काही नेते क्षुल्लक कारणावरून शिवसेना-भाजप युतीवर खडा टाकण्याचं स्वार्थी राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

दरम्यान, कल्याणमधील हा वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठका घेतल्या. पालघरमध्ये ‘शासन तुमच्या दारी’ कार्यक्रमानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक घेतली. पालघरमधील कार्यक्रमानंतर ग्रीन रुममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांची चर्चा झाली. या बैठकीत कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाच्या वादावर मुख्यमंत्री शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती. मवाळ भूमिका घेत उपमुख्यमंत्र्यांनी हा वाद मिटवला. आपण एकत्र आहोत, एकत्र काम करण्याची गरज असल्याचं सांगत युती धर्माचे पालन करण्याची सल्ला चव्हाण यांना दिला. एकमेकांविरोधात वाद निर्माण करण्याची आवश्यकता नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या वादावर पडदा पडताच श्रीकांत शिंदे जोमाने कामाला लागले.

Tags

follow us