Hatkanangale Lok Sabha constituency :
कोल्हापूर : आगमी लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेमधून राष्ट्रवादी (NCP) उमेदवार उतरविण्यासाठी चाचपणी करत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) हा मतदारसंघ स्वाभिमानीसाठी सोडणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टींची (Raju Shetty) कोंडी होणार असल्याचं बोललं जातं आहे. मात्र हातकणंगले लोकसभेची निवडणूक मी जनतेच्या पाठिंब्यावर व लोकवर्गणीतूनच स्वतंत्रपणे लढविणार असून, पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. समोर कोण आहे, कुठला पक्ष आहे, हे आम्ही बघणार नाही,’ अशी रोखठोक भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली. (Ex MP Raju Shetty talk on Hatkanangale Lok Sabha constituency)
पत्रकारांशी संवाद साधताना राजू शेट्टी यांनी पक्ष संघटनेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘महायुती आणि महाविकास आघाडी, दोन्हीपासूवन आम्ही समान अंतर राखून आहोत. आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नाशिवाय कसलाही विचार करावा वाटत नाही. जागा वाटपाबाबत कोणाबरोबरही एका शब्दाने चर्चा केली नसेल तर जागा वाटपाच्या यादीत आपले नाव येतेच कसे? संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाला आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही गाफील राहिलो. संघर्ष करूनही माझा पराभव झाला, पण मी पराभवाने खचणारा माणूस नाही. चळवळ माझ्या नसानसात भिनलेली आहे. जनतेच्या प्रश्नासाठी मी प्रत्येकवेळी संघर्षाची भूमिका घेतलेली आहे. महाविकास आघाडीतून आम्ही गतवर्षीच बाहेर पडलेलो आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असं शेट्टी यांनी स्पष्ट केलं.
शेट्टी पुढे म्हणाले, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या 6 जागा लढविणार आहे. आपण कोणत्याही चर्चेला अथवा बैठकीला गेलो नाही, तरीही आपल्या विषयीच्या बातम्या पेरल्या गेल्या. पण मतदारसंघाची मशागत कशी करायची आणि घात कशी साधायची यात आपण वस्ताद आहे. जनताच पेरक्या असल्याने योग्य वेळी मतदारसंघातील जनता करेक्ट कार्यक्रम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
2 दिवसांपूर्वीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा आढावा बैठक पार पडली. यात राष्ट्रवादीने कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागांचा आढावा घेतला. यानुसार कोल्हापूरमधून हसन मुश्रीफ तर हातकणंगलेमधून जयंत पाटील यांच्या उमेदवारीवर चाचपणी करण्यात आली. तसंच “उद्धव ठाकरे साहेब यांना समजावून सांगितले पाहिजे की, कोल्हापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावी. ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास आपण जिंकू शकतो. शिवसेनेचे आधी जितके आमदार निवडून आले होते ते आता नाहीत. उलट या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि काँग्रेसचे 3 आमदार आहेत. त्यामुळे आमच्याकडे नेहमी राहिलेला हा मतदारसंघ पुन्हा मिळावा, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली.