Jitendra Ahwad : धर्म स्वातंत्र्य विधेयक विधानसभेच्या सभागृहात सादर करण्यात आले आहे. या विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार पक्ष) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वादळी चर्चा करत काही मुद्दे मांडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकावर बोलताना मात्र जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) हे चुकीचे बोलू गेले. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावर बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केले. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाल्यानंतर सभागृह दहा मिनिटेत स्थगित करण्यात आले. त्यानंतर सभागृह सुरू झाल्यानंतर आव्हाड यांनी माफी मागितली.
हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांचा आहे. काहींनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करू दिला नव्हता. त्यांना शुद्र म्हटलं गेलं. त्यांच्या राज्याभिषेक कसा केला सांगताना आव्हाड चुकीचे बोलून गेले. त्यावर शंभूराज देसाई (Shamburaj Desai) यांनी आक्षेप घेतला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकवर आव्हाड हे चुकीचे बोलले आहेत, असे कोणत्याही पुस्तकात लिहिलेले नाही, असे शंभुराज देसाई यांनी म्हटलं. दादा भुसे यांनी आव्हाडांबाबत आक्षेप घेतला. त्यांनी या भारताचे, महाराष्ट्राचे दैवत शिवाजी छत्रपती महाराजांचा घोर अपमान केला आहे. काही जण दहा-दहा लग्न करतात, त्यावर आव्हाड बोलत नाही. त्यांना कोणी परवाना दिला आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी दादा भुसे यांनी केली.
त्यानंतर अध्यक्षांनी सभागृह दहा मिनिटे स्थगित केले. जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजी महाराजांबाबत उल्लेख केला आहे. दिलगिरी व्यक्त करावी, माफी मागावी, अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी दिलगिरी व्यक्त केली.
जितेंद्र आव्हाडांना निलंबित करा; राणे संतापले
जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितली आहे. परंतु त्यावर त्यांनी चुकीचे हातवारे केले आहेत. आमच्यावर ते उपकार करतात का ? ते कुणाला खूश करायला हे करत आहे. त्यांना निलंबित करा, अशी मागणी नितेश राणे यांनी केले आहे.
