Download App

राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत सरन्यायाधीश अ‍ॅक्शन मोडमध्ये; पवारांच्या मागणीनंतर दिले महत्त्वाचे निर्देश

राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद न्यायालयात असतानाच आतापर्यंत काय घडलं याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रतेचा वाद अजूनही मिटलेला नाही. हा वाद न्यायालयात असतानाच या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. आमची बाजू ऐकून घेतल्यानंतर 23  तारखेला याबाबत सुनावणी लावून घ्यावी, हे प्रकरण मी स्वतः ऐकणार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणाल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

आव्हाड यांनी याबाबत ट्विट करत एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, की महाराष्ट्रातील फाटाफुटीनंतर अपात्रतेची लढाई सुरुच आहे. अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भातील आमची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. आज आमच्या वकिलांनी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले.

हे म्हणणे ऐकल्यानंतर 23  तारखेला याबाबत सुनावणी लावून घ्यावी, हे प्रकरण मी स्वतः ऐकणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील गद्दारी लोकांसमोर आली पाहिजे अन् त्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे यासाठी आमचा हा लढा सुरू आहे. कारण, महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीचा हा भाग असून आपले संस्कार आणि संस्कृती वाचविली पाहिजे असे आव्हाड यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Sanjay Raut : ‘मुश्रीफ, अजितदादा अन् भुजबळ ‘महादेव अ‍ॅप’ मेंबर.. राऊतांचा गंभीर आरोप

चौथ्या नंबरच्या न्यायालयात न्यायाधीश सूर्यकांत यांच्यासमोर नागालँडच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी होती. या याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून दोन मिनिटात नोटीस काढण्याचे आदेश दिले ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. याच प्रकरणात त्यांना सांगितले की 3 एप्रिलपर्यंत अजित पवार गटाला आपले म्हणणे सादर करण्याचे आदेशही दिले होते. मात्र अजित पवार गटाने आजपर्यंत म्हणणे मांडलेले नाही.

ही बाब ऐकल्यानंतर ही बाबही कामकाजात घ्या, हेही प्रकरण मी ऐकणार आहे. आता आनंदाची गोष्ट ही आहे की तिन्ही याचिकेसंदर्भात नागालँडची एक आणि महाराष्ट्रातील दोन याचिका न्यायालयासमोर आहेत. त्याच्या तारखाही लागल्या आहेत. त्यामुळे आता आम्हाला अपेक्षा आहे की येत्या एक ते दीड महिन्यात या सर्व याचिकांवरील सुनावणी संपलेली असेल आणि महाराष्ट्राला न्याय मिळेल. या याचिकेसंदर्भात शरद पवार साहेब अत्यंत गंभीर असून त्यांनी सर्वांशी चर्चा करून या याचिका अत्यंत ताकदीने लढण्याचे निर्देश दिले आहेत.

follow us