Nitesh Rane : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवरही टीका केली होती. त्यांच्या याच टीकेवर आज भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी खोचक प्रत्युत्तर दिले.
Nitesh Rane : संजय राऊतच्या मालकानेच मराठा आरक्षण घालवलं; राणेंचा हल्लाबोल
आ. राणे आज भाजप आमदार प्रकाश भोयर यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त वर्ध्यात आले होते. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आ. पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर आरक्षणाची मर्यादा वाढवून घ्यावी लागेल. मात्र, यासाठी केंद्रातील मोठं इंजिन म्हणजे केंद्र सरकार ऐकत नाही अशी टीका केली होती, असे विचारले असता राणे (Nitesh Rane) म्हणाले, रोहित पवार सध्या सीनियर केजीत आहेत. अजून ते शाळेतही पोहोचलेले नाहीत. त्यांना अजून मिशा दाढी आणि आवाजाचा कंठही फुटलेला नाही. थोडा त्यांनी अनुभव घ्यावा. पहिल्या टर्मचेच ते आमदार आहेत. नागपूर, विदर्भात फिरण्यापेक्षा थोडं कर्जतमध्ये लक्ष घातलं तर माजी आमदार लिहीण्याची वेळ येणार नाही. म्हणून मोठे सल्ले देण्यापेक्षा कर्जतमध्ये लक्ष घातले तर आमदारकी तरी राहिल नाहीतरी 2024 मध्ये वांधे होणारच आहेत.
मराठा समाजाचे आरक्षण उद्धव ठाकरे यांच्यामुळेच गेले आहे. ज्यावेळी संजय राऊत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेण्यासाठी उपोषणस्थळी गेले होते तिथे त्यांना बोलू सुद्धा दिले नाही. त्यांच्या मुखपत्रात राऊतच्या मालकाच्या आदेशाने मराठा क्रांती मोर्चाला मुका मोर्चाचे कार्टुनही छापले गेले होते. त्यामुळे या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार त्यांना राहिलेला नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर ओबीसी समाजाकडून आंदोलनाची भाषा होऊ लागली आहे, असे विचारले असता राणे म्हणाले, मराठा आरणक्षणसाह ओबीसी, धनगर आरक्षणाच्याबाबतीत आमचं सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे त्यांनी अन्य गोष्टींकडे लक्ष देऊ नये. सरकारवर विश्वास ठेवावा, असे आवाहन आ. राणे (Nitesh Rane) यांनी केले.