Download App

Amit Shah : उद्धव ठाकरेंचं स्वागत करणार का? अमित शाहांचं एकाच वाक्यात उत्तर

Amit Shah on Uddhav Thckeray : लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सुरुवात (Lok Sabha Election) झाली आहे. इंडिया आघाडीला रोजच धक्के (INDIA Alliance) बसत आहेत तर भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए आघाडी मजबूत होताना दिसत आहे. भाजपात इनकमिंग जोरात सुरू झाले आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडला आहे. देश पातळीवरही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) पुन्हा एनडीएत सहभागी झाले आहेत.

नितीश कुमारांनी मध्यंतरी भाजपाला झटका देत लालू प्रसाद यादव यांच्या राजदशी हातमिळवणी केली होती. मात्र थोड्याच दिवसांत त्यांनी पलटी मारली. भाजपानेही कोणतेही आढेवेढे न घेता त्यांना पुन्हा सोबत घेतले. आता महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती होईल का. उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) पुन्हा भाजप सोबत घेईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिलं आहे.

उद्धव ठाकरे आणि भाजप यांची जुनी मैत्री आहे. मध्यंतरी दोन्ही पक्षांत दुरावा निर्माण झाला आहे. तरी देखील राजकारणात कुणीच कुणाचा शत्रू नसतो या उक्तीप्रमाणे उद्धव ठाकरे पुन्हा भाजपबरोबर येतील का, यावर राजकीय जाणकारांकडून तर्कवितर्क लावले जात आहेत. या सगळ्यांवर अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही 9 च्या वार्षिक कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपाने जुने मित्र नितीश कुमार यांना सोबत घेतलं आहे. त्याचप्रमाणे आता एनडीए सोडून गेलेल्या उद्धव ठाकरेंची परतण्याची इच्छा असल्यास भाजप त्यांचं स्वागत करेल का, असा सवाल विचारण्यात आला.

Amit Shah : नवे फौजदारी कायदे ते हिट अँड रनची प्रकरणं; इंग्रजी पाऊलखुणा मिटवण्याचं अमित शाह यांचं लक्ष्य

यावर शाह म्हणाले, या जर-तरच्या चर्चांना काहीच अर्थ नसतो. तुम्ही मला आगामी निवडणुकांबाबत प्रश्न विचारा. अन्यथा तुमची वेळ संपेल असे मोजकेच उत्तर देत शाह यांनी या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं. एकंदरीतच उद्धव ठाकरे यांना पुन्हा एनडीएत घेण्यास भाजप फारसा उत्सुक दिसत नसल्याचे अमित शाह यांच्या उत्तरावरून आता स्पष्ट  होत आहे.

दरम्यान,  मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावर मत व्यक्त केलं होतं. सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर आमची मनं दुखावली गेली आहेत. उद्धव ठाकरेंचा व्यवहार ते ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात त्यामुळे आमची मनं दुखावली गेली आहेत. जिथे मनं दुखावतात तिथे युती होत नाही.

follow us

वेब स्टोरीज