Download App

शरद पवार अन् अजितदादांच्या गुप्त भेटीत काय खलबतं? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं नेमकं कारण

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. काल पुण्यात एका उद्योजकाच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या कारणामुळे दोघांची भेट झाली याचा काहीच तपशील अद्याप समोर आलेला नाही. या भेटीबाबत कमालीचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या भेटीबाबत धक्कादायक माहिती दिली आहे.

सर्वांनी सोबत यावं, सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद : दिल्लीचा निरोप घेऊन झाली काका-पुतण्याची भेट?

प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत मोठा खुलासा केला. पत्रकारांनी त्यांना या भेटीबाबत प्रश्न विचारला. त्यावर आंबेडकर म्हणाले, जयंत पाटील यांचे एक नातेवाईक आहेत. त्यांना ईडीची नोटीस आलेली आहे. या ईडीच्या नोटीससंदर्भातली ती बैठक होती. त्याच्यापुढे काय झालं हे मला सुद्धा माहिती नाही. बैठक कशासंदर्भात होती हे मी तुम्हाला सांगितलं पण त्यात काय ठरलं हे मला माहिती नाही, असे आंबेडकर म्हणाले.

अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर थोड्याच दिवसात माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मिळाला. यात काही कनेक्शन आहे असे वाटते का, या प्रश्नावर आंबेडकर म्हणाले, तसं काही वाटत नाही. आम्हाला जी माहिती मिळत होती त्यावरून त्यांच्या प्रकृतीचा विषय होता. कोर्टाने सुद्धा त्यांच्या वैद्यकिय कारणांमुळेच त्यांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला आहे.

शरद की अजितदादा कुणावर विश्वास

या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना तुमचा शरद पवार की अजित पवार यांपैकी कुणावर विश्वास आहे असा प्रश्न विचारला त्यावर आंबेडकर यांनी उत्तर देताच जोरदार हशा पिकला. आंबेडकर यांनी माझा कुणावरच विश्वास नाही असे म्हणत हा मुद्दाच निकाली काढला.

भगत पाटील यांना ईडीची नोटीस; भावासह जयंत पाटलांचे 6 निकटवर्तीय रडारवर

2024 मध्ये मोदी पंतप्रधान राहणार नाहीत

देशातील राजकीय परिस्थिती पाहता 2024 मध्ये कुणाचं सरकार येईल हे मी आताच सांगत नाही. मात्र सरकार कुणाचंही असो 2024 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आरएसएसला तत्वाचं राजकारण, नितीमत्तेचं राजकारण याची काहीच गरज वाटत नाही. राजकारणात सध्या युती आणि आघाड्या होत आहेत त्यांनी कायमची मूठमाती द्या असे आम्ही 2024 च्या निवडणुकीत लोकांना सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags

follow us