Download App

‘इंडिया’ बैठकीवरील लक्ष हटविण्यासाठी लाठीमार; राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचे संतप्त पडसाद राज्यात उमटत आहेत. विरोधी पक्षांनी तर राज्य सरकावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा देण्याचीही मागणी केली जात आहे. यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका करत गंभीर आरोप केले आहेत.

या घटनेनंतर आज राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, या घटनेत सरकारच दोषी आहे. राज्य कुणाचं आहे? गृहखातं कुणाकडे आहे? पोलीस खातं काय विरोधी पक्ष चालवत आहे का? आमच्या काळातही मोर्चे निघाले पण असे लाठीहल्ले कधी पोलिसांनी केले नाहीत. स्वतः मुख्यमंत्री आणि अजित पवारही त्या समितीत होते. त्यांना प्रश्न माहित आहे. आंदोलन का चिघळले?, आंदोलकांवर लाठीहल्ला का केला? असा सवाल उपस्थित केला.

Raj Thackeray : ‘इथे सरकारचं चुकलं हे निश्चित’; लाठीमाराच्या घटनेवर राज ठाकरेंनी फटकारलं

इंडिया बैठकीवरील लक्ष हटविण्यासाठी लाठीहल्ला

यामागे राजकीय सुसूत्रता आहे. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरू होती. देशातील मोठे नेते हजर होते. चर्चा सुरू होती. संपूर्ण देशाचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. या बैठकीवरून लोकांचे लक्ष हटविण्यासाठी हा लाठीहल्ला करण्यात आला, असा आरोप संजय राऊत यांनी केला.  मराठा समाजाचे आधीही मोर्चे निघाले. पण त्यांनी कधीच कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले नाहीत. अशा वेळी जाणीवपूर्वक लाठीमार करून राज्यात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. त्या माध्यमातून मुंबईतील बैठकीवरून लोकांचं लक्ष हटवायचं त्यासाठी सरकारने सुनियोजितपणे केलेला हा लाठीहल्ला आहे.

लाठीमार करण्याचं काहीच कारण नव्हतं. सरकारला संयम राखता आला असता. पण सरकारनं मोर्चाचं वातावरण चिघळू दिलं त्यानंतर लाठीमार घडवून आणला.  आज जो तणाव राज्यात दिसतोय निवडणुकीआधी देशातल्या विविध राज्यात दंगली घडवल्या जातील हे जे आम्ही वारंवार सांगतोय त्याचं हे प्रमाण आहे. आज बीड, जालना जिल्ह्यात जो तणाव निर्माण झाला आहे. जाळपोळ झाली हे या सरकारचं अपयश आहे. परंत एकदा सांगतो, निवडणुकीआधी देशात दंगली घडवायच्या हे यांचं कारस्थान आहे आणि त्याची पहिली ठिणगी सरकारने जालन्यात टाकली आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

Maratha Reservation Protest : जालन्यातील लाठीचार्जनंतर एस टी महामंडळ सतर्क; एसटीच्या फेऱ्या बंद

सरकारला किंमत मोजावी लागेल, आम्ही सोडणार नाही

हा गंभीर विषय आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा इतकं हे गंभीर आहे. हे सरकार फक्त कपट कारस्थानात मश्गुल आहे. खोटे खटले दाखल करायचे, भ्रष्टाचार करायचा. कुठे आहे कायदा सुव्यवस्था? आम्ही वारंवार सांगत आहोत की महाराष्ट्र असो की देश असो निवडणुका जिंकण्यासाठी हे लोक दंगली भडकावतील. जात आणि धर्माच्या नावावर हे लोक दंगली भडकवतील. त्यांना कोणतेच कारण चालणार नाही. जालन्यात अमानुष पद्धतीन लाठीमार करण्याचं काहीच कारण नव्हतं. शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्या सरकारला याची किंमत मोजावी लागेल. आम्ही सोडणार नाही, असा रोखठोक इशारा राऊत यांनी दिला.

Tags

follow us