Download App

अजितदादांवर अन्याय झाला का? जयंत पाटलांनी एका वाक्यात स्पष्टपणे दिलं उत्तर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या वर्धापन दिनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली. पक्षात आता कार्यकारी अध्यक्ष हे पद निर्माण करण्यात आले असून या पदावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Prafful Patel) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही कार्यकारी अध्यक्ष पक्षाचे प्रमुख या नात्याने काम करणार आहेत. मात्र या घोषणेनंतर राज्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चा आहेत. (NCP leader Jayant Patil clearly Said About Ajit Pawar after party deaccession)

घोषणेनंतर बैठक संपताच अजित पवार तातडीने उठून निघून गेले. यामुळे देखील पवार नाराज आहेत का? असा सवाल विचाराला जात आहे. मात्र या चर्चांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खंडन केले आहे. जयंत पाटील यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावतीने भूमिका मांडत ते नाराज नसल्याचे स्पष्ट केलं. तसंच इतरही मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं.

काय म्हणाले जयंत पाटील?

नव्या जबाबदाऱ्यांसह नवी टीम काम करण्यास तयार आहे. आम्ही सर्व एकसंघपणे काम करणार आहोत. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांना आणखी राज्यांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत, अन्य लोकांनाही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी पक्षाचा विस्तार, व्यवस्था यासाठी काय करावं लागेल हे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.

तर अजित पवार महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे.  महाराष्ट्रात अजित पवार आणि आम्ही पक्ष वाढवण्याचं काम करत आहोत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. परंतु अन्य राज्यांमध्ये ती कमी आहे. जी जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ते अन्य राज्यांमध्ये जात पक्षाचा विस्तार करण्याचं काम करतील.

बैठकीनंतर अजित पवार निघून गेले :

जेव्हा बैठक संपली त्यानंतर त्या ठिकाणाहून उठायलाच हवं ना. सर्व जण उठल्यानंतर ते त्या ठिकाणी बसून राहतील असं अपेक्षा करता का? अजित पवारांवर कोणताही अन्याय झालेला नाही. जे काही निर्णय घेतले जातात ते विचारपूर्वकच घेतले जातात, असेही पाटील यांनी स्पष्ट केलं.

Tags

follow us