Radhakrishna Vikhe Patil On Rahul Gandhi : कोणतेही विधान करताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भान ठेवले पाहीजे. शिर्डीतील मतदार संख्येचा जावई शोध त्यांनी कुठुन लावला हाच खरा प्रश्न आहे. जनाधार गमावलेले नेते आता चुकीची विधान करून जनतेसमोर येण्याचा प्रयत्न करीत असल्याचा टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी लगावला.
राहूल गांधी यांनी शिर्डी मतदार संघाच्या बाबतीत केलेल्या विधानावर माध्यमांशी बोलतांना विखे पाटील म्हणाले की, राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाला (BJP) मिळालेल्या जनादेशाचे खरे दुख त्यांना आहे. जिल्ह्यातील सामान्य लोकांनी प्रस्थापितांना घरी बसवले याचा विसर राहूल गांधी यांना पडला असल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.
ज्यांचा पराभव झाला त्यांनीच राहुल गांधी यांना चुकीची माहिती पुरवली का? या प्रश्नावर बोलतांना विखे पाटील म्हणाले की, ते आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी धडपड करीत आहेत. मात्र येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीचेच वर्चस्व राहील विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना अत्यंत दुर्दैवी
तसेच यावेळी त्यांनी शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना अत्यंत दुर्दैवी असून वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर उपाय योजना करण्याची गरज आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. असं देखील मंत्री विखे पाटील म्हणाले. पुढील आठवड्यात शहरात पुन्हा एकदा कोबिंग आॅपरेशन करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पावले उचलावीत. आजच्या घटनेत पोलिसांचा हलगर्जीपणा असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्याबाबत आदेश दिले असल्याचे देखील विखे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान सांयकाळी उशिरा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ आणि वरीष्ठ अधिकारी यांच्यात बैठक झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला संस्थानचे गोरक्ष गाडीलकर अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैभव कलबुर्गे, पोलीस उपअधीक्षक वमने, पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिष दिघे, कैलास कोते, विजय जगताप, कमलाकर कोते, सचिन शिंदे, नितीन कोते आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेत स्थानिक पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या चुकांचाही आढावा घेण्यात आला.शहरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय छुप्या पध्दतीने सुरू असून याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. शहरातील पाॅलिश वाल्यावर तसेच रात्री उशिरा पर्यत शहरात फिरणार्यावर कारवाई बेकायदेशीर सुरू असलेल्या रीक्षांच्या कागदपत्रांची तपासणी करावी.
मोठी बातमी! सरकारी, निमसरकारी आणि पालिका ऑफिसमध्ये मराठी भाषा अनिवार्य
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अवैध धंद्याची माहिती गोपनीय माहिती पोलीस उपअधिक्षकांकडे द्यावी.मंदिर परिसरातील सुरक्षेसाठी असलेले पोलीस आता शहराच्या सुरक्षेसाठी वापरावेत. संस्थानने आता त्यांच्या परीसराची सुरक्षा यंत्रणा वापरण्याच्या सूचना विखे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिल्या.