Download App

‘मी प्रश्न विचारला अन् शिंदे-नार्वेकरांचे दौरेच रद्द; डर अच्छा है!’ आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aditya Thackeray : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या परदेश दौऱ्यावरून राजकारण सुरू झाले आहे. सीएम शिंदे 1 ऑक्टोबरपासून दहा दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र अचानक हा दौरा काही कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. या दौऱ्यात उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील शिंदे यांच्याबरोबर जाणार होते. आदित्य ठाकरे (Aditya Thackray) यांनी या दौऱ्यावरून प्रश्न उपस्थित केले होते. त्याची सरकारला भीती आहे. त्यामुळेच हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले होते. त्यानंतर आता खुद्द आ. आदित्य ठाकरे यांनीच यावर प्रतिक्रिया देत शिंदेंना डिवचले आहे.

“बनवाबनवी चालणार नाही, मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण” : जरांगेंनी आशिष देशमुखांना फटकारले

आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली. ठाकरे म्हणाले, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री परदेश दौरा करणार होते. जर्मनीला जाणार होते का तर रस्ते पहायला. कित्येक वर्षे खातं तुमच्याकडेच होतं मग तुम्ही जे रस्ते तयार केले ते चुकीचे होते का? लंडनला जाणार होते. आम्ही प्रश्न विचारल्यानंतर तीस मिनिटात दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मंत्रालयातून देण्यात आली. आमच्या ट्विटनंतर दौरा रद्द करावा लागला. जनतेचा पैसा आम्ही वाचवला. डर अच्छा है! असे ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंचं ट्विट काय होतं ?

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या बहाण्याने आयोजित केलेल्या परदेशी पर्यटनावर प्रश्न विचारणारे ट्वि मी काल केले होते. माझ्या ट्विटनंतर अर्ध्या तासात त्यांनी आपला दौरा पुढे ढकलला. यावरून स्पष्ट होते की, हा दौरा म्हणजे, राज्याच्या कामासाठीची बैठक नसून निव्वळ परदेशवारी होती. मागे देखील दावोसच्या 28 तासांच्या सहलीवर बेकायदा मुख्यमंत्र्यांनी करदात्यांच्या 40 कोटींचा चुराडा केला होता. सरकारच्या परदेश दौऱ्यातून राज्याला काही लाभ होणार असेल तर त्याला आमचा विरोध नाही पण करदात्यांच्या पैशांवर बेकायदा मुख्यमंत्र्यांनी सुट्टीवर जाणे, आम्हाला मंजूर नाही. मी प्रश्न विचारताच ही सहल रद्द झाली. डर अच्छा है!

नार्वेकरांचाही दौरा रद्द

मी योग्य प्रश्न विचारताच, बेकायदा मुख्यमंत्र्यांप्रमाणे विधानसभा अध्यक्षांनी आपला परदेश दौरा रद्द केला. नार्वेकर जी ह्यांच्या वेळकाढूपणामुळे महाराष्ट्रातील लोकशाहीची हत्या होत असताना ते राष्ट्रकुल संसदीय परिषदेला निघाले होते. हाच मोठा विनोद होता. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात विलंब का होतोय, याचे उत्तर नार्वेकर जी यांनी महाराष्ट्राला आधी द्यावे. त्यांची निष्क्रियता केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या लोकशाहीवर आणि मतदानाच्या शक्तीवर विश्वास असलेल्या प्रत्येकावर अन्याय करणारी आहे.

Tags

follow us