Download App

कारवाईनंतर सोमय्यांचे थेट कोल्हापूरमध्ये येऊन मुश्रीफांना आव्हान

कोल्हापूर : माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकत कारवाई केली. त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या हे या कारवाईनंतर पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मुश्रीफांवर टीका केली. ‘मुश्रीफांनी मला काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जाण्यापासून रोखले होते. तसेच आता ईडीने छापा टाकत कारवाई केल्यानंतर मुश्रीफांना धर्म आठवला आहे.’ असं देखील सोमय्या म्हणाले.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी, त्यांच्या मुलींच्या घरावर, त्यांच्या मुलाच्या सरसेनापती संताजी घोरपडे या कारखान्यावर आणि पुण्यातील काही लोकांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत प्राप्तीकर विभागाचे अधिकारीही होते. ईडीचे जवळपास 20 अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पोहोचले होते.

त्याचबरोबर सोमय्या पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जी काही माफियागिरी सुरू आहे. ती आता बंद होत असून त्यांच्यावर कारवाई होत आहे. काहीजण आत गेले, काहीजण बाहेर आले, तर काही जणांवर कारवाई होत आहे. यामुळे यांच्याशी लढण्यासाठी मला शक्ती मिळावी, यासाठी मी अंबाबाई चरणी आलो आहे.’

कारवाईनंतर हसन मुश्रीफ म्हणाले होते की, ‘ज्या ब्रिक्स कंपनीचा उल्लेख माझ्यावर आरोप करण्यासाठी होतोय तीच्याशी माझा संबंध नाही. तर आप्पासाहेब नलावडे हा करखाना शासनाच्या नियमाप्रमाणे या ब्रिक्स कंपनीला भाडे करारावर चालवायला दिला होता. पण दोन वर्षांपूर्वी ही कंपनी कारखाना सोडून गेली. या कारखान्यावर आता नियमाप्रमाणे संचालक मंडळ आहे. तर माझ्या जावायाचा याच्याशी काही संबंध नाही.’

‘हे कशासाठी केलं जातय याचा मला अंदाज नाही. मात्र यामुळे माझ्या कुटुंबीयांना नाहक त्रास होतोय. मुलीच्या घरी छापा टाकला तिच्या सासूला त्रास झाला. माझ्याही घरात सुना- नातवंड आहेत. वातावरण भयभीत करायचं हे योग्य नाही. कारवाई आमच्यावर करा, मुला-बाळांना नाहक त्रास देऊ नका.’ असं म्हणत यावेळी ईडीने छाप्यानंतर हसन मुश्रीफ भावूक झाल्याचं दिसून आलं होतं.

Tags

follow us