Download App

Uddhav Thackeray : आधी ‘पेगासस’, आता ‘अ‍ॅपल’; फोन हॅकिंग वादात ठाकरे गटाची उडी

Uddhav Thackeray : देशाच्या राजकारणात सध्या विरोधी नेत्यांच्या फोन हॅकिंग प्रकरणावरून चांगलाच गदारोळ उठला आहे. फोन हॅक होत असल्याचे अलर्ट अॅपल कंपनीकडून येत असल्याचा दावा या नेत्यांनी केला आहे. या मुद्द्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकारची कोंडी केली आहे. या वादात आता ठाकरे गटानेही (Uddhav Thackeray) उडी घेतली असून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. एकीकडे फोन टॅपिंग वगैरे काहीही नाही असा आव आणायचा आणि दुसरीकडे चौकशीचा फार्स करून आपण साव असल्याचा देखावा करायचा, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. तुका म्हण चोरटाचि झाला साव| सहज न्याय नाही येथे|| असेच गेल्या नऊ वर्षात देशात सुरू आहे. त्यामुळेच आधी ‘पेगासस’ घडले आणि आता ‘अ‍ॅपल’. आव आणि साव हाच मोदी सरकारचा चेहरा आणि मुखवटा असल्याने दुसरे काय घडणार ? असा सवाल ठाकरे गटाने विचारला आहे.

Rahul Gandhi : ‘हॅकिंगला घाबरत नाही, अदानींनी माझा फोन न्यावा’; राहुल गांधींचं चॅलेंज!

त्यावेळीही सरकारने तेच केले होते

तीन-चार वर्षांपूर्वी पेगासस प्रकरणाने मोदी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होत. या प्रकरणाचा धुरळा तर सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यांत एवढा गेला होता की सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले होते. पेगासस हे प्रभावशाली इस्त्रायली स्पायवेअर आहे. त्याचाच वापर करून मोदी सरकार प्रमुख विरोधी नेत्यांसह देशातील 40 पत्रकारांच्या हालचालींवर नजर ठेवत असल्याच्या आरोपांनी खळबळ उडाली होती. सरकारने हे आरोप फेटाळले होते. परंतु, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयानेच तीन तज्ज्ञांची चौकशी समिती नेमली होती. अर्थात त्याही वेळी मोदी सरकारने नागरिकांच्या व्यक्तिगत नागरी अधिकारांचा आपण आदर करतो अशी पुंगी वाजवली होती. आता ताज्या फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा ही देखील गाजराची पुंगीच आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

कोणता पुरावा दिला म्हणजे सरकारला खरे वाटेल ?

विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन हॅक करण्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर होणारे नवीन नाहीत. आता पुन्हा एकदा या आरोपांनी या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. काही विरोधी नेत्यांच्या आयफोनवर सरकार पुरस्कृत सायबर हल्ल्याचा इशारा मिळाल्याचे हे प्रकरण असून ते गंभीर आहे. अॅपल कंपनीने दिलेल्या अशा इशाऱ्याचे स्क्रिन शॉट्सच या सर्व नेत्यांनी पुराव्यादाखल दिले आहेत. तरीही सरकार म्हणते की हे आरोप खोटे आहेत. मग, आणखी कोणता पुरावा दिला म्हणजे सरकारला ते खरे वाटेल, असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

Naresh Goyal: जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांना ED चा दणका; 538 कोटींची संपत्ती जप्त

follow us