Download App

उद्वव ठाकरे गटाने केली शिंदेंच्या २३ आमदारांची कोंडी!

  • Written By: Last Updated:

(Uddhav Thaceray Vs Eknath Shide) खरी शिवसेना कोणाची, बंडखोर आमदार कोण आणि त्यातील अपात्र कोण या साऱ्या मुद्यांवर   उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाची परीक्षा विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू आहे. या सुनावणीत रोज वेगवेगळे टर्न घेतले जात आहेत. या निकालावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सरकारचे भवितव्य ठरणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिंदे यांच्यासह तेरा आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी ठाकरे गटाने केलेली याचिकेची सुनावणी ३१ डिसेंबरपर्यंत संपविण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. ही सुनावणी कधी संपेल आणि तिचा निकाल काय लागेल, याची खात्री कोणी देऊ शकत नसले तरी या सुनावणीतील ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना कोंडीत पकडल्याचे दिसून आले आहे. सहा तास चाललेली ही उलटतपासणी ही साऱ्या केसमधील महत्वाचा टप्पा ठरली.

एकनाथ शिंदेंना हटवण्याच्या पत्रावर २३ आमदारांच्या सह्या; ठाकरे गटाने शिंदेंना खिंडीत पकडलं

त्यामागचे नाट्यही तेवढेच रंगतदार आहे. शिंदे यांनी २० जून २०२२ च्या रात्री पहिले बंड केले. तेव्हा त्यांच्यासोबत १३ आमदार पहिल्यांदा सुरतला पोहोचले. शिंदे त्यानंतर गुवाहटीला गेले. तेथे त्यांना सेनेचे इतर आमदार मग मुंबईहून तेथे येऊ लागले. शिंदे यांचे बंड शमत नसल्याचे स्पष्ट होताच इकडे तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या गटानेही हालचाली सुरू केल्या. लगेचच २१ जूनला वर्षा बंगल्यावर उर्वरीत आमदारांची बैठक घेण्यात आली. तेव्हा २३ आमदार हे ठाकरे यांच्यासोबत होते. या बैठकीत शिंदे यांना गटनेतेपदावरून हटविण्याचा ठराव झाला. या ठरावावर या आमदारांच्या सह्या होत्या. या सह्या केल्यानंतरच अनेक आमदार मग ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले. शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० आमदार आले. त्यानंतर ठाकरे यांनी राजीनामा दिला. शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता या साऱ्या सुनावणी २१ जूनची ठाकरे यांच्याकडील बैठक महत्वाची ठरली आहे.

‘निवडणुकीच्या तयारीला लागा’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं 13 खासदारांना फर्मान…

या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी शिंदे गटाला अडचणीत आणणाऱ्या प्रश्नांची सरबत्ती करून त्यांना कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. कामत यांनी आमदार योगेश कदम आणि दिलीप लांडे या शिंदे गटातील दोन आमदारांची उलटतपासणी घेतली. शिंदे यांना हटविण्याच्या ठरावावर तुमची सही आहे, हे कामत यांनी दाखवून दिल्यानंतर या दोघांचीही या प्रश्नावर उत्तर देताना तारांबळ उडाली. याला उत्तर देताना दोघांनाही कसरत करावी लागली. कदम यांनी तर सही आपल्यासारखी दिसते पण ती केल्याचे आठवत नाही, असे सांगून वेळ मारून नेली. तर लांडे यांनी सही नाकारली नाही पण ती बैठकीआधी घेतल्याचे सांगितले. गुवाहटी येथील हाॅटेलची तिकिटे कोणी बुक केली होती, भाजपने की शिंदे यांना या प्रश्नाला कदम हे थेट उत्तर देऊ शकले नाहीत.

शिंदे यांना हटविण्याचा हा प्रस्ताव आता ठाकरे गटाची प्रमुख ढाल बनला आहे. एकीकडे या ठरावावर सह्या करून ही आमदार मंडळी गुवाहटीला पोहोचली, असे ठाकरे गटाला दाखवून द्यायचे आहे. २१ जूनपर्यंत ही मंडळी ठाकरेंचा व्हीप मानत होती. हा व्हीप सुनील प्रभू यांनीच लागू केलेला होता. हाच मुद्दा ठाकरे गट मांडत आहे. त्यामुळे शिंदे गटाने गोगावले यांचा व्हीप म्हणून नियुक्त करणे बेकायदा होते, असा आता पुढील युक्तिवाद शिवसेनेचा होणार आहे. ही बैठक बेकायदा होती आणि आमच्या सह्या बनावट असल्याचा दावा शिंदे गटाने सुरू केला आहे.

 

ठाकरे यांच्याविरोधात बंड का केले, असा प्रश्न ठाकरेंच्या वकिलाने विचारता आपला महाविकास आघाडीला विरोध होता, असे सांगत आमदार दिलीप लांडे यांनी बाजू लावून धरली. पण त्याचा लेखी पुरावा आहे का, असे विचारल्यावर मी आमच्या नेत्यांकडे तशी भावना व्यक्त केल्याचे सांगत लांडेंनी प्रत्युत्तर दिले. त्यांच्यकडे तुम्ही चौकशी करू शकता, असेही शिंदे यांनी सुचविले. आता हे नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत. शिंदे यांना उलटतपासणीसाठी बोलविण्याचा आग्रह ठाकरे गट धरणा का याचीही उत्सुकता आहे. एकूणच ठाकरेंना पाठिंबा आणि शिंदे यांना पदावरून हटविण्याचा ठराव, अशा दोन्ही ठिकाणच्या सह्या या शिंदे गटासाठी सध्या तरी अडचणीच्या ठरल्या आहेत.

Tags

follow us