Download App

भुमरे आणि जलील यांना खैरे चितपट करणार?, ‘ही’ आहेत कारणं

छत्रपती संभाजीनगर लोकसभेचं गणित यावेली वेगळं होतं. येथे शिवसेनेचे दोन उमेदवार, वंचितचा एक आणि एआयएमआयएमचा एक. त्यामुळे येथे लढत चौरंगी झाली.

Image Credit: letsupp

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान काल (दि. 13 मे)रोजी पार पडलं. यामध्ये सर्वांचं लक्ष लागलं होतं ते छत्रपती संभाजीनगरकडे. येथे साधारण 60.73 टक्के इतकं मतदान झालं. त्यामुळे येथील जनता खैरे, भुमरे की पुन्हा एकाद जलील या तिघांपैकी नेमकं कुणाच्या गळ्यात खासदारकीची माळ टाकणार हे 4 जूनला स्पष्ट होईलच. गेल्यावेळी खैरे यांचा पराभव झाला. (Chhatrapati Sambhajinagar) त्या पराभवाची सहानुभूती खैरेंच्या मागे आहे. मात्र, या निवडणुकीत जितकं जातीचं राजकारण दिसलं ते याआधी कधीच दिसलं नव्हतं असं येथील राजकीय जाणकार सांगतात. या मतदारसंघात विकासाचे मुद्दे आहेत. परंतु, त्याहीपेक्षा येथील मतदार सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मतदान करतात असा देखील येथील जाणकारांचं मत आहे.

 

 

विकास, सहानभूती की सुरक्षा?

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाच्या आखाड्यात पहिल्यांदाच दोन शिवसेनेचे दोन शिवसैनिक समोरासमोर होते. यामध्ये ठाकरे गट म्हणजेच मविआकडून चंद्रकांत खैरे, तर महायुतीकडून शिवसेनेना शिंदे गटाचे पैठणचे आमदार संदिपान भुमरे मैदानात आहेत. याशिवाय, ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एआयएमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान हे दोघेही मैदानात असून, हर्षवर्धन जाधव यावेळीही अपक्ष म्हणून निवडणूक लञवत आहेत. या सर्व चेहऱ्यांमध्ये मुख्य लढत ही शिवसेना VS शिवसेना यांच्यातच मानली जात आहे.

 

 

खैरेंना सहानुभूतीचं बळ मिळणार?

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना पक्ष विभागला गेला. मात्र, चंद्रकांत खैरेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. ते एकनिष्ठ राहिले. हा एक सकारात्मक संदेश मतदारांपुढे गेला. त्याशिवाय मराठवाड्यात शिवसेना वाढवण्यात मोलाचा वाटा असून, ग्रामीण भागातील मतदारांमध्ये खैरे आणि ठाकरेंबाबत प्रचंड सहानभूती असल्याचं चित्र आहे. याशिवाय, यावेळी खैरे भाजपविरोधात असल्याने काही प्रमाणावर अल्पसंख्यकांची मतेही खैरे यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. यंदा वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार दिल्याने मोठ्या प्रमााणात दलित मतदान हे खैरे यांच्या पाठीशी गेल्याचे चित्र आहे. संभाजीनगर शहर, वैजापूर, गंगापूरमधून खैरेंना लीड मिळेल. कारण या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाची ताकद अधिक आहे.

 

 

भुमरेंना नेमका फायदा कशाचा?

अनेकांनी खैरेंना सहानभूती म्हणून मतदान केलं आहे. तर, दुसरीकडे भुमरे हेदेखील चार टर्म आमदार आहेत. त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत. शिवाय आता ते पालकमंत्रीदेखील असून, ग्रामीण भागातील असल्याने त्यांचं तेथील मतदारांवर विशेष वर्चस्व आहे. याशिवाय भुमरे यांच्यापाठिशी भाजप आणि मोदींचा चेहरा आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने खैरेंना सहाभूतीच्या जोरावर मतदान केलेल्यांची संख्या आहे त्याचप्रमाणे भुमरेंना विकासाच्या बाजून मतदान केलेल्यांची संख्यादेखील अधिक आहे.

 

 

मराठा मतं गणित बदलणार

गेल्या काही दिवसांत मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठावाड्यात मोठ्या प्रमाणात गाजला होता. त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच भुमरेंना बसण्याची दाट शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. हा फटका बसू नये म्हणूनच महायुतीकडून भुमरेंना मैदानात उतरवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, सध्या तरी मराठा समाजाची मते विभागलेली असल्याचं चित्र असून, मराठा समाजाचा काही भाग युतीकडे, तर मोठा भाग महाविकास आघाडीकडे जाऊ शकतो, असं चित्र आहे. मराठा आणि ओबीसी समाजात बऱ्यापैकी त्यांनी स्वतःची जागा निर्माण केल्याचं चित्र आहे.

 

 

विजयी उमेदरांमध्ये लीड कितीचा असेल?

छत्रपती संभजीनदरमधील निवणुकीत खैरे आणि भुमरे यांच्यातच टफ फाईट असून, जो कुणी उमेदवार विजयी होईल त्यांच्यामध्ये केवळ 5 ते 7 हजार मतांचा फरक असेल असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आता येथील मतदार विकासाच्या मुदद्यावरून भुमरेंना खासदार करणार की सुरक्षेच्या मुद्द्यावरून खैरेंना पुन्हा संधी देणार याचे चित्र 4 जूनला निकाल आल्यानंतरचं स्पष्ट होणार आहे. परंतु, भुमरे विजयी होतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

follow us

वेब स्टोरीज