मुंबई: लोकसभा आणि विधानसभेच्या मतदारसंघाच्या फेररचना (मतदारसंघ परिसीमन, Constituency Delimitation) विधेयकावरून उत्तर आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये संघर्ष होणार आहे. या विधेयकामुळे जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यांचे खासदार वाढणार आहेत. तर कमी लोकसंख्या असलेल्या राज्यांना कमी प्रतिनिधित्व मिळणार आहे. त्यामुळे प्रगतशील असलेल्या महाराष्ट्राबाबत भविष्यात अनेक चिंता निर्माण होऊ शकतात. परंतु त्याबाबत महाराष्ट्रातील राजकारणी गप्प बसले आहे. यावर ज्येष्ठ राजकीय विश्वेषक डॉ. सुहास पळशीकर (Dr. Suhas Palashikar) यांनी चिंता व्यक्त करत महाराष्ट्रातील राजकारण्यांना फटकारले आहे.
बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. पळशीकर यांनी ही चिंता व्यक्त केलीय. लोकसंख्यानिहाय मतदारसंघामुळे उत्तरेतील राज्यांना फायदा होईल. तर दक्षिणेकडील राज्यांना तोटा होणार आहे. पण महाराष्ट्रात काय होईल तर फारसे काही होणार नाही. जे आकडेवारी फिरवली जात आहे. त्यानुसार लोकसभेच्या एखाद्या दोन जागा वाढतील. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणी म्हणतील आपलं काही नुकसान नाही, आपण गप्प बसावे. मला वाटतं तो पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे, असा टोला पळशीकर यांना लगावला आहे.
भविष्यात महाराष्ट्राला फटका बसणार ?
महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढीचा दर कमी व्हायला सुरूवात झाली आहे. भविष्यात महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा कमी होऊ शकतात. त्यामुळे दक्षिण -उत्तर मुद्दा न पाहता सगळ्या राज्यांना समावले जाईल, अशी भूमिका पाहिजे. ते पाहण्यात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय राजकारणी कमी पडत आहेत. महाराष्ट्रातील राजकारणी, राजकीय पक्ष, राजकीय प्रतिनिधी, कुणाला मोठे राजकारण देशात चाललंय हे कळत नाही.
त्या राजकारणात राज्य म्हणून भाग घेऊ शकतो, याची जाणीव राहिलेले नाही. महाराष्ट्रातील राजकारण इतके डबक्याचे झालेले आहे. देशातील प्रश्न सोडा., महाराष्ट्रातील हिताचे विचार कोणी करत नाही. आता कोणी महाराष्ट्राचे राजकारणी प्रतिसाद देत नाही. ते लपून बसतात का ? कारण आमच्या जागा कमी होणार नाही, याचे त्यांना समाधान असल्याचे पळशीकरांनी म्हटलंय.
