Download App

Video : आता वारकरीच आरोपीच्या पिंजऱ्यात; आळंदी लाठीचार्ज प्रकरणातील दुसरा व्हिडीओ समोर

Dnayaneshawar Mauli Palakhi :  आळंदी येथे काल ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी पोलिस व वारकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचे आढळून आले. त्यानंतर सोशल मीडियावर  अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हिडीओत पोलिस व वारकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले. तसेच काही तरुण वारकऱ्यांनी आम्हाला मारहाण झाल्याचे देखील म्हटले. यानंतर आता या घटनेचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये काही तरुण वारकरी पोलिसांना धक्काबुक्की करताना दिसत आहे.

आळंदीमध्ये वारकऱ्यांना लाठीमार करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर हा दुसरा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये पोलिसांनी वारकऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केलेला असतानाही काही तरुण नियम डावलत धक्काबुक्की करत, पोलिसांना मागे ढकलत व त्यानंतर पोलिसांना तुडवत मंदिराच्या दिशेने धावत असल्याचे दिसून येत आहे.

असला कुठलाही प्रकार घडला नाही, लाठीचार्ज प्रकरणातील आरोप बावनकुळेंनी फेटाळले

काल ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केल्याचे दिसून आले होते. मात्र, तो लाठीमार झाला नसून किरकोळ झटापट झाल्याचे पिंपरी- चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले. यानंतर आता या घटनेचा आणखी एक व्हिडीओ समोर आल्याने हे प्रकरण आणखी लांबण्याची शक्यता आहे.

काल या झटापटीचा व लाठीचार्जचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधण्यात आला होता. सर्व विरोधकांनी व सोशल मीडियावर अनेकांनी वारकऱ्यांची बाजू घेतली होती. पण आता या व्हिडीओनंतर पोलिसांनी नेमका लाठीचार्ज केला की वारकऱ्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली हे चौकशीअंती स्पष्ट होईल.

लाठीचार्ज केलेले हे वारकरी हिंदू नाही का? रोहित पवारांचा सरकारला सवाल

दरम्यान, कालच्या या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला आहे. वारकऱ्यांवरचा हल्ला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवरचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा हल्ला आहे. पंढरीची वारी ही महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता आहे. संपूर्ण जगाभरामध्ये वारीचा सन्मान केला जातो. त्यांचं नियोजन, संयम, शांतता, शिस्त अशी वारी असते आणि त्या वारीवर सरकारच्या माध्यमातून असे संकट कधी आले नव्हते. हे सरकारमधील लोकं विठोबाची महापूजा करायला बसतील. त्यांना हा अधिकार नाही. त्यांनी आधी वारकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे, असे ते म्हणाले.

Tags

follow us