पुणे: भारतीय संस्कृती संरक्षण संस्थानचे कार्याध्यक्ष डॉ. नंदकिशोर एकबोटे यांच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त (Kargil Vijay Diwas) संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली (Saint Shrestha Shri Dnyaneshwar Mauli) यांच्या संजीवन समाधीस्थळी पुष्पवृष्टी सैनिकाच्या हस्ते करण्यात आले. पुण्यवचने व कीर्तन सोहळा अत्यंत भक्तिमय व देशभक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात भारतीय सैनिकांच्या अद्वितीय शौर्याला अभिवादन करत त्यांच्या त्यागाचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमात ह.भ.प. दिगंबर महाराज नरवडे यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून कारगिल युद्धातील वीर सैनिकांच्या पराक्रमाची प्रेरणादायी गाथा उलगडली. त्यांनी सांगितले की, १९९९ च्या कारगिल युद्धात भारतीय जवानांनी सुमारे २०,००० फूट उंचीवरील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शत्रूचा पराभव करून जगासमोर भारतीय सैन्याचे शौर्य सिद्ध केले. रात्रीच्या अंधाराचा व गनिमी काव्याचा प्रभावी वापर करून भारतीय जवानांनी विजय संपादन केला. या युद्धात ५२७ भारतीय जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले, तर अनेक सैनिक कायमचे जखमी झाले; मात्र त्यांच्या देशप्रेमाचा आणि जिद्दीचा इतिहास आजही प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.
हरिनामाचा गजर करीत विद्यार्थ्यांनी केला पर्यावरणाचा आदर; जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे अनोखा पालखी सोहळा
यावेळी “रात्रंदिवस आम्हा नामाचे हत्यार…” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संदर्भ देत सैनिकांच्या राष्ट्रनिष्ठेचा गौरव करण्यात आला. “आपण आज सुरक्षित आणि सुखी आहोत, कारण देशाच्या सीमांवर भारतीय सैनिक अहोरात्र जागे आहेत,” असा भावनिक संदेशही देण्यात आला.
कार्यक्रमात नायक सुभेदार धनेश्वर भोस, सुभेदार गणेश दामोदर, नायक नरेंद्र वाघमारे, नायक संदीप इंदलकर, कॅप्टन बाळासाहेब आढाव आणि नायक सुभेदार दत्तात्रय पोतदार यांसह कारगिलमधील वीर जवानांच्या कार्याचा विशेष उल्लेख करून त्यांना अभिवादन करण्यात आले.डाॅ. नारायण महाराज जाधव, अजित वडगावकर सचिव ज्ञानेश्वर शिक्षण संस्था,अर्जुन मेदनकर,दशरथ महाराज चवरे, ह.भ.प.निवृत्ती महाराज ताठे, खंडू खेडकर,सागर सर्जेराव,प्रशांत निंबाळकर, ओंकार ताठे,मच्छिंद्र धिरडेकर, नारायण खोकले या सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या व
यावेळी उपस्थित मान्यवर डॉ.नंदकिशोर एकबोटे म्हणाले की,भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथा शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रसेवा आणि सैन्यदलात दाखल होण्याची प्रेरणा निर्माण होईल, अशी मागणी केली.व राष्ट्रपती भवनात ज्ञानेश्वर माऊलीचे पसायदान स्थापित व्हावे या साठी सर्व स्तरातून प्रयत्न व्हावेत. ही भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी कारगिल युद्धातील सर्व वीर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून भारतीय सैन्याच्या शौर्याला कृतज्ञतापूर्वक मानवंदना देण्यात आली. संपूर्ण परिसर “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” आणि “जय जवान, जय हिंद” अशा घोषणांनी दुमदुमून गेला. कार्यक्रमाला भाविक, वारकरी, नागरिक आणि देशप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
