KSCA T20 League : महाराजा ट्रॉफी KSCA T20 लीगसाठी खेळाडूंच्या लिलावात अनेक खेळाडूंनी मोठी रक्कम मोजून फ्रँचायझींनी खरेदी केले. मात्र भारताचा दिग्गज खेळाडू आणि माजी प्रशिक्षक राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) मुलाला झटका बसला. लीगमधील कोणत्याही फ्रँचायझीने त्याला आपल्या संघात सहभागी करुन घेतलं नाही. मागील वेळी केएससीए लीगमध्ये समित खेळला होता परंतु, यंदा अंतिम यादीत त्याचं नावही नव्हतं. यामुळे त्याचे चाहते निराश झाले आहेत.
टीम इंडियातील (Team Inida) उदयोन्मुख खेळाडू देवदत्त पडिक्कल (Devdutta Padikkal) सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. देवदत्तला हुबळी टायगर्सने 13 लाख 20 हजार रुपये बोली लावून आपल्या संघात घेतलं. देवदत्त पडिक्कल आयपीएलमध्येही (India Premier League) खेळताना दिसला होता. आता या लीगमध्येही त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
राहुल द्रविडचा दिलदारपणा; सहकाऱ्यांसाठी अडीच कोटींच्या बोनसवर सोडलं पाणी
समित द्रविडला (Samit Dravid) मागील हंगामात मैसूर वॉरियर्सने 50 हजारांत खरेदी केले होते. परंतु, यावेळी त्याचं नाव लिलावाच्या अंतिम यादीतही नव्हतं. आधी असलं सांगितलं जात होतं की समितला ज्यूनियर राज्य खेळाडू यादीत ठेवण्यात आलं आहे. परंतु, लिलावाच्या अंतिम यादीत स्थान न मिळाल्याने त्याला यंदा संधी मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. समित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या अंडर 19 संघात होता. परंतु, दुखापतीमुळे त्याला संघातून बाहेर पडावे लागले होते.
अनुभवी फलंदाज मनिष पांडे आणि आयपीएलमध्ये चर्चेत राहिलेला अभिनव ममोहर या दोघांनाही चांगली रक्कम मिळाली. मनिषला मैसूर वॉरियर्स तर अभिनवला हुबळी टायगर्सने 12 लाख 20 हजार रुपये देऊन खरेदी केले. कर्नाटकचा वेगवान गोलंदाज विद्वथ कावेरप्पा याला शिवमोगा लायन्सने 10 लाख 80 हजारात घेतलं. विद्याधर पाटीलला बंगळुरू ब्लास्टर्सने 8 लाख 30 हजार रुपयांत खरेदी केले.
श्रेयस गोपालला मंगळुरू ड्रॅगन्सने 8 लाख 60 हजार रुपयांत खरेदी केले तर अनीश्वर गौतमला शिवमोगा लायन्सने 8 लाख 20 हजार रुपयांत आपल्या टीममध्ये घेतले. या लीगमध्ये सहा संघ आहेत. 11 ते 27 ऑगस्ट दरम्यान स्पर्धा होणार आहे. या लीगमध्ये मैसूर वॉरियर्स, बंगळुरू ब्लास्टर्स, गुलबर्गा मिस्टिक्स, हुबळी टायगर्स, मंगळुरू ड्रॅगन्स, शिवमोगा लायन्स या सहा संघांचा समावेश आहे.
रोमांचक सामना, इंग्लंडचा विजय पण चर्चा सौरव गांगुलीची…, लॉर्ड्स कसोटीत नेमकं घडलं तरी काय?