Download App

T20 मध्ये अव्वल टीम इंडिया! वर्षभरात फक्त एक पराभव; प्रत्येक सामन्यात नवा ‘हिरो’

क्रिकेट विश्वात सध्या टीम इंडियाची (Team India) धूम आहे. टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ टॉप आहे.

Team India : क्रिकेट विश्वात सध्या टीम इंडियाची (Team India) धूम आहे. टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ टॉप आहे. कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) संघाची कामगिरी दमदार राहिली. या वर्षात भारतीय संघाने आतापर्यंत 20 टी सामने खेळले त्यापैकी 18 सामन्यात विजय मिळाला. यामध्ये टी 20 विश्वचषकाचाही (T20 World Cup)  समावेश आहे.

सध्या टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर (IND vs SL) आहे. या दौऱ्यात टी 20 मालिका भारताने जिंकली (India vs Sri Lanka) आहे. तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत सर्व सामने जिंकून भारताने श्रीलंकेचा सुपडा साफ केला. या मालिकेतील तिसरा सामना सर्वाधिक थरारक राहिला. या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव केला. या सामन्यात भारताला फक्त 137 धावा करता आल्या.

त्यामुळे श्रीलंका जिंकेल असेच वाटत होते. सामन्याच्या अठराव्या ओव्हरपर्यंत सामना श्रीलंकेच्याच बाजूने होता. नंतर मात्र चित्र बदलले. 15 ओव्हर पर्यंत श्रीलंकेचा स्कोअर एक विकेट गमावून 108 असा होता. शेवटच्या पाच ओवरमध्ये श्रीलंकेला फक्त 30 धावांची गरज होती. नऊ विकेट हातात होत्या. त्यामुळे भारतीय चाहत्यांनी सामना जिंकण्याची आशा सोडली होती. पण शेवटच्या टप्प्यात सूर्या आणि हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) या जोडीने कमाल केली.

तिकीट कलेक्टर नाही आता रेल्वे अधिकारी; पदकवीर ‘स्वप्नील’ला रेल्वेनेही दिलं प्रमोशन

शेवटच्या दोन ओव्हरमध्ये सामना फिरला. वीस ओव्हर संपल्यानंतर सामना बरोबरीत सुटला होता. शेवटचे दोन ओव्हर तर रिंकू सिंह (Rinku Singh) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी (Surya Kumar Yadav) टाकल्या. या दोघांनीही प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. यानंतर सुपर ओव्हरचा निर्णय घेण्यात आला. यावेळी वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजीची संधी दिली. सुंदरने सुद्धा अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. त्यामुळे श्रीलंकेच्या फलंदाजांना फक्त दोन रन करता आले. यानंतर मैदानात उतरलेल्या सूर्य कुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून विजय नोंदवला.

टी 20 क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा

टी 20 क्रिकेटमध्ये 2024 वर्ष भारतासाठी चांगले राहिले आहे. भारतीय संघाने या वर्षात आतापर्यंत 20 टी 20 सामने खेळले आहेत. यातील 18 सामने जिंकले आहेत. यामध्ये अफगाणिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध सुपर ओव्हरमधील विजयांचाही समावेश आहे. टी 20 विश्वचषकात भारत-कॅनडा (Ind vs Canada) यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. यानंतर 6 जुलै रोजी झिम्बाब्वेने (IND vs ZIM) टीम इंडियाचा पराभव केला होता.

या सामन्यात संघातील सर्व स्टार खेळाडू मैदानाबाहेर होते. शुभमन गिलकडे कर्णधारपद देण्यात आले होते. यानंतर मात्र या मालिकेतील सर्व सामने भारताने जिंकून सीरिज 4-1 फरकाने जिंकली. सन 2024 मध्ये टीम इंडियाचा आतापर्यंतचा स्कोअर 234 रन तर सर्वात कमी स्कोअर 102 असा राहिला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने टीम इंडियानेच जिंकले आहेत. 2006 पासून आतपर्यंत भारतीय क्रिकेट संघाने एकूण 235 टी 20 सामने खेळले आहेत. यामध्ये 154 सामन्यात विजय (65.53 टक्के) मिळाला आहे. 69 सामन्यात मात्र पराभव स्वीकारावा लागला. या दरम्यान 6 सामने अनिर्णित राहिले.

टी 20 विश्वचषकातही टीम इंडिया अव्वल

2007 आणि 2024 या दोन टी 20 विश्वचषकांचा विजेता भारतीय संघ आहे. या टूर्नामेंटमध्ये भारतानेच सर्वाधिक सामने जिंकले आहेत. भारताने 9 टी 20 विश्वचषकात 59 सामने खेळले आहेत. यामधील 35 सामन्यात विजय मिळाला आहे. तर 15 सामन्यात पराभव झाला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. विजयाची टक्केवारी 69.60 टक्के इतकी राहिली आहे.

2007 च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध टाय (IND vs PAK) झालेल्या सामन्यात बॉल आऊट प्रकारात भारत विजयी झाला होता. 2022 मधील विश्वचषकापर्यंत 51 सामन्यातील 31 विजयांसह श्रीलंका नंबर वन टीम होती. परंतु 2024 मधील विश्वचषकात श्रीलंकेला फक्त एकच सामना जिंकता आला. सुपर 8 फेरीतही प्रवेश करता आला नाही. दक्षिण आफ्रिकेसह श्रीलंका 32-32 विजय मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (Pakistan) संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दोन्ही संघांनी या टूर्नामेंटमध्ये प्रत्येकी 30-30 सामने जिंकले आहेत.

follow us