Krantijyoti Vidyalaya Marathi Medium : मराठी शाळेच्या वास्तवाशी जोडलेली आणि भावनिक नाळ निर्माण करणारी कथा मांडणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे. सकाळी ७ वाजताचा पहिला शो असो वा रात्री १२ वाजताचा शेवटचा शो, दोन्ही वेळांना चित्रपटगृहं हाऊसफुल भरताना दिसत आहेत. हिंदी आणि दाक्षिणात्य बिग बजेट चित्रपटांच्या स्पर्धेतही या मराठी चित्रपटाने आपले स्थान ठामपणे अधोरेखित केले आहे.
अनेक चित्रपटगृहांमध्ये (सिंगल स्क्रीन) इतर चित्रपटांचे शो कमी करून ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’चे शो वाढवले जात आहेत. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात ६.१४ कोटींची उल्लेखनीय कमाई केली असून, दुसऱ्या आठवड्यात या यशाला आणखी वेग मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मराठी आशयप्रधान चित्रपटासाठी हा प्रतिसाद विशेष मानला जात असून, बुकिंग प्लॅटफॉर्मवरही चित्रपट सतत ट्रेंडिंगमध्ये आहे.
प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चित्रपटाचे भरभरून कौतुक होत आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे, कलाकारांची कामगिरी, संगीत आणि कथानक यांची विशेष दखल प्रेक्षक घेत आहेत. “हेमंत ढोमे यांनी अत्यंत उत्कृष्ट चित्रपट दिला आहे,” “शाळेतील आठवणी पुन्हा जिवंत झाल्या,” “मराठी भाषा व मराठी शाळेची गळचेपी कोणताही अतिरेक न करता प्रभावीपणे मांडली आहे,” अशा प्रतिक्रिया सातत्याने व्यक्त होत आहेत. चित्रपटाची संवेदनशील मांडणी प्रेक्षकांना भावुक करून असल्याचे अनुभव अनेकांकडून समोर येत आहेत.
या यशाबद्दल लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “मराठी प्रेक्षक दर्जेदार आणि आशयपूर्ण चित्रपटाला नेहमीच मनापासून साथ देतो. ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ला मिळणारा प्रतिसाद प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अपेक्षेपलीकडचा आहे. इतका मोठा आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद आम्ही कल्पनाही केली नव्हती. सकाळपासून रात्रीपर्यंत हाऊसफुल शो, प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसणारी भावुकता आणि चित्रपटानंतर मिळणाऱ्या प्रतिक्रिया हे सगळं अत्यंत भारावून टाकणारं आहे. चांगल्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याची संस्कृती हीच मराठी चित्रपटसृष्टीची खरी ताकद आहे. या प्रेमाने संपूर्ण टीमला नव्या उमेदीने पुढे काम करण्याचं बळ दिलं आहे.”
नाशिकची आईसारखी सेवा करू, सत्ता आमच्या हातात द्या; एकनाथ शिंदेंची नाशिककरांना ग्वाही
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या प्रदर्शित असून यात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट झळकत आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले असून, क्षिती जोग निर्माती आहेत. सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.
