Download App

बांग्लादेशातील सत्तांतराचा भारताला धक्का; व्यापारात तोटा, राजकीय वजनही घटणार

शेख हसीना यांनी सत्ता सोडल्याने आता बांग्लादेशात त्या सर्व गोष्टी होतील ज्या चीन आणि पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरतील.

Bangladesh Violence : बांग्लादेशात सध्या परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली (Bangladesh Violence) आहे. देशात सगळीकडे उन्मादी जमावाची हिंसा सुरू आहे. येथील सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच अल्पसंख्याक समाजही प्रचंड दहशतीत आला आहे. बांग्लादेशात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर भारत सरकार (India Bangladesh) अत्यंत बारकाईने लक्ष ठेऊन आहे. कारण या देशातील घडामोडींचा भारतावरही परिणाम होत आहे. या दरम्यान भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध आजमितीस कसे आहेत? याचा पाया कधी घातला गेला? आणि दोन्ही देशांत व्यापार कसा आहे? या गोष्टींचा आढावा घेऊ या..

भारताने हस्तक्षेप केल्यामुळेच आज बांग्लादेश (Bangladesh News) अस्तित्वात आला हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाकिस्तानच्या अनन्वित (Pakistan) अत्याचारांनी हैराण झालेल्या बंगाली भाषिक पूर्व पाकिस्तानातील जनतेला दिलासा देण्यात भारताचे सर्वाधिक योगदान राहिले. या देशाची इतकी मदत केल्यानंतरही सैन्य शासन आल्यानंतर बांग्लादेशने अनेक वाद उपस्थित करण्यास सुरुवात केली. पण नंतर १९९६ मध्ये जेव्हा शेख हसीना (Sheikh Hasina) सत्तेत आल्या त्यानंतर दोन्ही देशांतील वाद निवळत गेला.

Mohammad Yunus: बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन, अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस नेतृत्व करणार

जमीन आणि पाण्यासाठी करार

शेजारी आधी हेच भारताचे धोरण राहिले आहे. याच धोरणाचा भाग म्हणून भारताने २०१० नंतर बांग्लादेशला सात बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त रक्कम कर्ज रूपात दिली आहे. दोन्ही देशांनी २०१५ मध्ये जमीन सीमा करारासह पाणी वाटप आणि समुद्री सीमा विवादावर तोडगा काढण्यात यश मिळवले. भारत आणि बांग्लादेश दरम्यान ४०९६.७ किलोमीटर लांब भू सीमा आहे. त्यामुळेच सामरिक दृष्ट्या बांग्लादेश भारताला जास्त महत्त्वाचा ठरतो. पश्चिम बंगाल, आसाम, मिझोराम, मेघालय आणि त्रिपुरा या भारतीय राज्यांची हद्द बांग्लादेशला लागून आहे. या सीमांचे रक्षण करण्यासाठी दोन्ही देशांचे सैन्य सातत्याने अभ्यास करत असतात.

रेल्वे आणि समुद्री वाहतुकीत महत्त्वाचा भागीदार

भारत आणि बांग्लादेश दरम्यान रेल्वे सेवा सुरू आहेच. या संबंधांची सुरुवात सन २०२३ मधील अखैरा- अगरतळा रेल्वे लिंक पासून झाली. या योजनेच्या माध्यमातून बांग्लादेशाशी भारतातील पूर्वोत्तर राज्यांना त्रिपुरा मार्गे जोडले जाते. या रेल्वे लाईनच्या माध्यमातून भारत बांग्लादेशातील चितगाव आणि मोंगला बंदरांपर्यंत कोणत्याही अडचणी शिवाय पोहोचत आहे. आता त्रिपुरा पासून शंभर किलोमीटर अंतरावर मटरबारी बंदराची उभारणी बांग्लादेश कडून केली जात आहे. या बंदराच्या माध्यमातून राजधानी ढाका शहराला (Dhaka) पूर्वोत्तर भारताशी जोडून एक औद्योगिक कॉरिडॉर बनवला जाऊ शकतो.

भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार

भारत आणि बांग्लादेश ऊर्जा, व्यापार, कनेक्टिव्हिटी, संरक्षण या क्षेत्रांत सातत्याने एकमेकांना सहकार्य करत असतात. मागील दहा वर्षांच्या काळात दोन्ही देशांतील व्यापारात मोठी वाढ झाली आहे. यासह बांग्लादेश दक्षिण आशियात भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापार १०.८ बिलियन अमेरिकी डॉलर इतका राहिला होता. यानंतर पुढील २०२१-२२ या वर्षात व्यापारात आणखी वाढ होऊन १८ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचला. सन २०२२-२३ मध्ये कोरोना आणि नंतरच्या युक्रेन रशिया युद्धामुळे (Ukraine Russia War) व्यापारात घट झाल्याचे दिसून आले.

Bangladesh violence: बांग्लादेशमधील राजकीय अस्थिरता हिंदुंच्या जीवावर; मंदिरांची तोडफोड, जाळपोळ

भारताकडून बांग्लादेशला ‘या’ वस्तूंची निर्यात

बांग्लादेश ऊर्जा क्षेत्रात भारताचा मोठा भागीदार आहे. बांग्लादेश भारताकडून जवळपास दोन हजार मेगावॉट वीज मागवतो. या व्यतिरिक्त भारताकडून बांग्लादेशला निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये कॉटन आणि कॉटन वेस्ट प्रमुख आहेत. सन २०२१-२२ मध्ये १६४ कोटी डॉलर डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे कॉटन आणि कॉटन वेस्ट बांग्लादेशला निर्यात करण्यात आले होते. याच वर्षात भारताने बांग्लादेशला मोठ्या प्रमाणात गव्हाची निर्यात केली होती.

सन २०२१-२२ मध्ये भारताने ६१ कोटी डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचा तांदूळ आणि ५६ कोटी डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची साखर (Sugar) निर्यात केली होती. तसेच ४३ कोटी डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे अन्य प्रकारचे धान्याची बांग्लादेशला निर्यात करण्यात आली होती. याशिवाय भारतातून बांग्लादेशला भाजीपाला, विविध प्रकारची फळे, मसाले आणि खाद्य तेलाचीही निर्यात केली जाते.

बांग्लादेश ‘या’ वस्तू भारताला देतो

बांग्लादेश भारताला जवळपास दोन बिलियन डॉलर्स किमतीचे विविध प्रकारचे सामान निर्यात करतो. बांग्लादेशकडून भारत कपडे, विणलेले कपडे, जूट आणि जुटपासून तयार केलेल्या वस्तू, बॅग, पर्स आदी वस्तूंची आयात करतो. अशातच बांग्लादेश जेनरिक औषधे आणि फार्मास्युटिकल उत्पादनांचा निर्यातदार बनत आहे. भारत फार्मास्युटिकल उत्पादने आणि या संबंधित कच्चा माल बांग्लादेशकडून आयात करत आहे. भारत मसाले आणि मासे यांसारख्या वस्तू सुद्धा बांग्लादेशकडून मागवतो.

दोन्ही देशांच्या संबंधावर काय परिणाम होणार?

बांग्लादेशातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता दोन्ही देशांतील वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली आहे. याचा व्यापारावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. मागील काही वर्षांपासून दोन्ही देशांत तिस्ता सिंचन प्रकल्पासाठी चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसीना यांच्यात चर्चाही झाली होती. चीनसाठी (China) मात्र ही गोष्ट तापदायक ठरणार होती.

भारताच्या परीक्षेचा काळ सुरू

दरम्यान, भारतासाठी आता कठीण काळ सुरू झाला आहे. शेख हसीना यांनी सत्ता सोडल्याने आता बांग्लादेशात त्या सर्व गोष्टी होतील ज्या चीन आणि पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरतील. देशातील कोणत्याही प्रकल्पात भारताचा प्रभाव राहणार नाही. त्यामुळे आगामी काळात व्यापारी, राजकीय आणि सामरिक या सगळ्या आघाड्यांवर भारताला अधिक सावध राहावे लागणार आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात सन २००९ पासून दोन्ही देशांत ज्या सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत त्या सगळ्या थांबतील.

follow us