Iran Israel War : इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्ध सध्या तरी (Iran Israel War) थांबलं आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव काही प्रमाणात कमी झाला आहे. युद्ध थांबलं असलं तरी पुन्हा कधीही भडकू शकतं अशी परिस्थिती आहे. या घडामोडींचा विचार करून भारताने एक मोठा निर्णय घेतला आहे. देशाची ऊर्जा आणि सुरक्षा ओळखून हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकार आणखी सहा ठिकाणी इंधनाचे राखीव साठे तयार करणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागणार आहेत. परंतु, सध्याची तणावाची स्थिती पाहता हा निर्णय गरजेचा होता असे सांगण्यात येत आहे.
सध्याच्या काळात देशावर काही संकट आलं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर इंधनाचा साठा उपलब्ध आहे. मात्र हा साठा फक्त 9 दिवस पुरेल इतकाच आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यातील यु्द्ध जवळपास 12 दिवस सुरू होतं. या काळात जगातील इंधन पुरवठ्यावर काही प्रमाणात तरी परिणाम झाला. पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणारच नाही असेही नाही. जर अशी स्थिती पुन्हा निर्माण झाली आणि संघर्ष बरेच दिवस सुरू राहिला तर देशासमोर इंधनाचं मोठं संकट निर्माण होऊ शकतं.
इराणचा अणुकार्यक्रम अजून संपलेला नाही; अमेरिकेच्या एका गुप्तचर अहवालाने ट्रम्पचं गुपित उघड
या गोष्टींचा विचार करुन आता सरकारने किमान तीन महिने पुरेल इतका इंधन साठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत परदेशातून खनिज तेल मिळालं नाही तरी देखील तीन महिने काळजी करण्याचं कारण राहणार नाही. सरकारने यासाठी इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड या अभियांत्रिकी कंपनीला अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशातील सहा ठिकाणी खनिज तेलाचा साठा करण्यात येणार आहे, असे द मिंटच्या वृत्तात म्हटले आहे.
या वृत्तानुसार एक राखीव साठा कर्नाटकातील मंगळुरू येथील विशेष आर्थिक क्षेत्रात तयार करण्यात येईल. दुसरा साठा राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात होईल. तसेच उर्वरित चार साठे समुद्र किनाऱ्यांच्या जवळ किंवा तेल शुद्धीकरण केंद्रांच्या जवळ तयार केले जातील. यामुळे तेल वाहतूक अधिक सोपी होईल. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर आता यावर लवकरच कामही सुरू होईल. भविष्यात देशात आणखी इंधनाचा साठा होईल.
हल्ले बंद करा नाहीतर…., युद्धबंदी उल्लंघनावर डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्त्रायलला इशारा