Cabinet approves Dimbhe-Manikdoh tunnel : कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेअंतर्गत डिंभे-माणिकडोह जोड बोगद्याच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील पाणीवाटपाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या बोगद्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी या निर्णयाला आक्षेप घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या मुद्द्यावरून दोन जिल्ह्यांतील पाण्याचे राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा
कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याच प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असलेल्या डिंभे ते माणिकडोह जोड बोगद्यालाही हिरवा कंदील मिळाला आहे. डिंभे ते माणिकडोह दरम्यान सुमारे 16 किलोमीटर लांबीचा हा बोगदा उभारण्यात येणार असून, त्याद्वारे कुकडी प्रकल्पातील पा ण्याचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल, असा दावा करण्यात येत आहे.
या निर्णयामुळे कुकडी लाभक्षेत्रातील सुमारे दीड लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हटले आहे. विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, कर्जत आणि श्रीगोंदा या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी पक्षातील लोकशाही संपवली, शिंदेंच्या वकिलांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद
डिंभे धरणातून येडगाव धरणासाठी आरक्षित असलेले 6.217 टीएमसी पाणी उपलब्ध करण्याचा मार्ग या बोगद्यामुळे सुकर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कुकडी डाव्या कालव्याच्या आवर्तनादरम्यान येणारे अडथळे दूर होऊन लाभक्षेत्राच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या प्रकल्पामुळे दिलासा मिळू शकतो, अशी भूमिका विखे पिता-पुत्रांनी मांडली आहे.
दिलीप वळसे पाटलांचा विरोध; मुख्यमंत्र्यांकडे फेरविचाराची मागणी
एकीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातून या निर्णयाचे स्वागत होत असताना दुसरीकडे पुणे जिल्ह्यातून मात्र विरोधाचा सूर उमटू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. कुकडी प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प अहवालामध्ये या बोगद्याचा समावेश नसतानाही हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असल्याचा त्यांचा प्रमुख आक्षेप आहे.
या बोगद्यामुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यांच्या पाणी उपलब्धतेवर परिणाम होण्याची भीती वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे. या भागावर अन्याय होऊ नये, अशी भूमिका त्यांनी यापूर्वीही सातत्याने मांडली होती. त्यामुळे बोगद्याच्या कामाला दिलेली मंजुरी ही या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच बदल, नितीन गडकरींना मोठा धक्का; खातं जाणार?
18 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या प्रस्तावाबाबत पुनर्विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, असा दावा वळसे पाटील यांनी केला आहे. त्यानंतरही या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी केली आहे.
अहिल्यानगर विरुद्ध पुणे असा पाणी संघर्ष?
डिंभे-माणिकडोह बोगद्याचा प्रस्ताव राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या छाननीनंतर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून सादर करण्यात आला होता. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी त्याचवेळी पाणीवाटपावरून नव्या वादाची शक्यताही निर्माण झाली आहे.
एका बाजूला अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, कर्जत आणि श्रीगोंदा या तालुक्यांतील शेतकऱ्यांना बोगद्यामुळे सिंचनासाठी अधिक प्रभावीपणे पाणी मिळण्याची अपेक्षा आहे. तर दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यांच्या हक्काच्या पाण्यावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे आता केवळ सिंचन प्रकल्प म्हणून नव्हे, तर दोन जिल्ह्यांच्या पाणीवाटपाशी संबंधित संवेदनशील प्रश्न म्हणून पाहिले जात आहे.
Manoj Jarange on Vikhe Patil : सगळ्यात चालबाज विखे पाटील… जरांगे पाटील भडकले
डिंभे-माणिकडोह बोगदा प्रत्यक्षात आल्यानंतर उपलब्ध पाण्याचे वितरण नेमके कशा पद्धतीने होणार, कोणत्या भागाला किती पाणी मिळणार आणि विद्यमान लाभक्षेत्राच्या पाणीहक्कावर त्याचा काही परिणाम होणार का, हे मुद्दे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहेत. याच प्रश्नांवरून राजकीय नेत्यांसह शेतकरी संघटनाही आक्रमक होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे डिंभे-माणिकडोह जोड बोगद्याला मिळालेली मंत्रिमंडळाची मंजुरी अहिल्यानगरच्या दुष्काळी भागासाठी दिलासादायक असल्याचा दावा होत असतानाच पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमधून त्याला विरोध होत आहे. परिणामी, कुकडीच्या पाण्यावरून अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांदरम्यान आगामी काळात राजकीय तसेच शेतकरी संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
