El Nino & Dengue Malaria Connection WHO Warns India : देशात डेंग्यू आणि मलेरियाचा धोका पुन्हा वाढत असतानाच जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने भारताला आरोग्याच्या वाढत्या धोक्यांबाबत सावध केलं आहे. विशेषतः अल नीनोमुळे बदलणारे तापमान, पावसाचे स्वरूप आणि आर्द्रता यांचा परिणाम डासांच्या वाढीवर होऊ शकतो. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरियासारख्या डासांमार्फत पसरणाऱ्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता WHO ने व्यक्त केली आहे. WHOच्या Global Public Health Situation Analysis – El Niño मध्ये अल नीनोच्या परिणामांमुळे भारतासह काही देशांमध्ये आरोग्यविषयक जोखीम वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अल नीनो आणि डेंग्यू-मलेरियाचा नेमका काय संबंध आहे आणि भारतासाठी ही चिंता का महत्त्वाची आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे.
धडकी भरवणारा रिपोर्ट! AI मनुष्य जीवन संपवणार?, विनाशाची स्क्रिप्ट लिहणारं ‘p(doom)’ नेमकं काय?
अल नीनो म्हणजे नेमकं काय?
अल नीनो ही प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्वेकडील भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा वाढल्याने निर्माण होणारी हवामानविषयक घटना आहे. त्याचा परिणाम केवळ प्रशांत महासागरापुरता मर्यादित राहत नाही, तर जगातील विविध भागांतील तापमान, पाऊस आणि आर्द्रतेच्या पॅटर्नवर होतो. काही भागांत पाऊस अधिक पडू शकतो, तर काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं. हवामानातील या बदलांचा थेट किंवा अप्रत्यक्ष परिणाम डासांच्या जीवनचक्रावर होतो. El Nino & Dengue Malaria Connection WHO Warns India
Salary Hike : कर्मचाऱ्यांची 5-10 टक्क्यांवर बोलवणं; तिकडं पंतप्रधानांना थेट 64 टक्के पगारवाढ….
अल नीनोचा डेंग्यू-मलेरियाशी संबंध कसा?
डेंग्यू हा विषाणूमुळे होणारा आजार असून तो प्रामुख्याने संक्रमित एडीज डासांमुळे पसरतो. तर, मलेरिया हा प्लास्मोडियम परजीवीमुळे होतो आणि त्याचा प्रसार संक्रमित मादी अॅनोफिलीस डासांमुळे होतो. या डासांच्या वाढीसाठी तापमान, पाऊस आणि आर्द्रता हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यामुळे हवामानात होणारा बदल डासांची संख्या, त्यांची सक्रियता आणि रोगजंतूंच्या प्रसारावर परिणाम करू शकतो. पावसानंतर साचलेलं पाणी एडीज डासांसाठी प्रजननस्थळ ठरू शकतं. दुसरीकडे, तापमान वाढल्याने काही परिस्थितींमध्ये डासांची वाढ आणि हालचाल वाढू शकते. त्यामुळे अल नीनोमुळे बदललेलं हवामान डेंग्यू-मलेरियासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकतं.
तापमान वाढलं की डेंग्यूचा धोका वाढतो?
भारतामध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, सरासरी तापमान 24 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर डेंग्यू संसर्गाचा धोका वाढण्याशी संबंध आढळला, तर 30 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक तापमानात हा धोका आणखी वाढू शकतो. मात्र, याचा अर्थ तापमान 30 अंशांवर पोहोचताच डेंग्यू होईल, असा अजिबात नाही. डासांची प्रजाती, स्थानिक पातळीवरील पाणी साचण्याची स्थिती, माणसांची प्रतिकारशक्ती आणि विषाणूचा प्रकार अशा अनेक घटकांवर प्रत्यक्ष धोका अवलंबून असतो.
क्रूड 100 डॉलरजवळ पोहोचताच चिंता वाढली; सामान्य भारतीयांसह जगासाठी याचा अर्थ काय?
पाऊस कमी झाला तरी डेंग्यूचा धोका कसा?
अल नीनोमुळे एखाद्या भागात नेहमीपेक्षा कमी पाऊस पडला, तरी डासांचा धोका संपत नाही. उलट काही परिस्थितींमध्ये तो वाढू शकतो. पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला तर, अनेक घरांमध्ये बादल्या, टाक्या, कूलर, कुंड्या किंवा इतर भांड्यांमध्ये पाणी साठवून ठेवले जाते. हेच साचलेलं पाणी एडीज डासांसाठी प्रजननस्थळ बनू शकतं. म्हणजेच अतिवृष्टी आणि अत्यल्प पाऊस या दोन्ही परिस्थिती डासजन्य आजारांसाठी समस्या निर्माण करू शकतात.
भारतासाठी WHOचा इशारा महत्त्वाचा का?
भारतामध्ये डेंग्यू आणि मलेरिया हे आधीपासूनच सार्वजनिक आरोग्यासमोरील महत्त्वाचे प्रश्न आहेत. WHO च्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रातील डेंग्यूचा मोठा भार असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. त्यातच हवामानातील बदल आणि अल नीनोसारख्या घटनांमुळे तापमान, पाऊस आणि पाण्याच्या उपलब्धतेच्या पद्धती बदलू शकतात. त्यामुळे डासजन्य आजारांचा हंगामी धोका आणखी गुंतागुंतीचा होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 2026 मध्ये अल नीनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आरोग्य यंत्रणेच्या तयारीबाबत निर्देश दिले आहेत.
