Abdul Sattar accuses BJP of betrayal : छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीवरून महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. या निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मतभेद उघड झाले असून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर गंभीर आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने चर्चेपासून आम्हाला दूर ठेवत आमचा विश्वासघात केला, आमचा केसानं गळा कापला, अशा तिखट शब्दांत सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली.
जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत भाजपने राजकीय डावपेच आखात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोन्ही पदे आपल्या ताब्यात घेतली असून शिवसेना शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवले आहे. सत्तार यांच्या मते, सुरूवातीपासूनच भाजप हा डाव आखात होती. शिवसेना शिंदे गटातील पाच-सहा सदस्य फोडून त्यांना बाहेर नेण्यात आलं, तेव्हाच आम्हाला संशय आला होता. मात्र त्या काळात मी कौटुंबिक दुःखात असल्याने या घडामोडींमध्ये हस्तक्षेप करू शकलो नाही, असं देखील त्यांनी सांगितलं.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण यांच्यात चर्चा झाकी हाती. मात्र त्या चर्चेनंतर देखील भाजपने असा निर्णय घेतल्याने हा प्रकार विश्वासघातासारखा असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे. या घटनेचे परिणाम आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला भोगावे लागू शकतात, असा इशारा देखील त्यांनी दिला. संभाजीनगरच्या राजकारणाचा संदर्भ देताना सत्तार म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून या भागात शिवसेनेची मजबूत राजकीय परंपरा राहिली आहे. मात्र भाजपने केलेल्या या राजकीय खेळीमुळे त्या परंपरेला धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले.
या घडामोडींमुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून आता या प्रकरणावर शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाने वेळेत हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंना विश्वासात घेतले नाही, तर भविष्यातील महायुती धोक्यात येऊ शकते, असा इशारा देखील यावेळी सत्तर यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात निर्माण झालेला हा तणाव पुढील काळात कोणते वळण घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
