Harshwardhan Sapkal Claims Devendra Fadnavis : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होण्याच्या स्वप्नांकडे बघत असल्याचा दावा केला. सपकाळ यांच्या मते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घेण्याचे संकेत दिले आहेत. रेशीमबागेतील वातावरणातून फडणवीस यांना याबाबत माहिती मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानपदाची तयारी सुरू केली आहे, असा दावा त्यांनी पुणे येथे पत्रकारांसमोर केला.
सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्या मते, फडणवीस (Devendra Fadnavis) हे आपल्या जुना अनुभव आणि लोकप्रिय प्रतिमेचा उपयोग करून पंतप्रधानपदासाठी तयारी करत आहेत. मोदींकडे दोन राष्ट्रीय शेठ आहेत, त्यांचा प्रभाव फडणवीस यांचा मार्गदर्शन करणार्या लोकांवर (Congress) आहे. त्यामुळे पंतप्रधानपदासाठी लागणारी तयारी आणि संसाधने गोळा करण्याचे काम सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.
सपकाळ यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणात चर्चेला जोर लागला आहे. मोदींचा 75 वा वाढदिवस नुकताच पार पडला असून, त्यांच्या रिटायरमेंटबाबत चर्चा सुरू आहे. फडणवीस यांचे नाव या चर्चेत आल्याने राज्यात नवीन राजकीय गप्पा रंगल्या आहेत.
हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबतही सरकारवर टीका केली. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कोयता गँग, आका गँग, खोक्या गँग, रेती गँग या गुंडांनी धुमाकुळ घातला आहे. काही प्रकरणांमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढली जाते, आणि कारवाईसाठी पोलिस ठिय्या द्यावे लागतात. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यानं ही समस्या अधिक गंभीर झाली आहे, असे ते म्हणाले.
आर्थिक धोरणांवर टीका
सपकाळ यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवरही निशाणा साधला. देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढत आहे. उद्योगपतींना मोठ्या सवलती देण्यात आल्या आहेत, पण शेतकरी, कर्मचारी आणि समाजातील दुर्बल घटकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुंबईतील जमीन व नवी मुंबई विमानतळ यासारख्या प्रकल्पांसाठी सरकारने मोठा खर्च केला, परंतु गरजवंतांसाठी पावले उचलली जात नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.