Download App

Eknath Shinde : आधीचं सरकार ‘सायलेंट’, आताचे ‘अलर्ट’ मोडवर!… कोकणासाठी केल्या तीन महत्वपूर्ण घोषणा!

रत्नागिरी (खेड) : कोकणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्वपूर्ण घोषणा केल्या. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार, मंडणगड येथे नवीन औद्योगिक वसाहत (MIDC) आणि वादळापासून बचावासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने लोकांसाठी काम करत आहोत. गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचे सरकार सायलेंट मोडवर होते. आताचे शिंदे-फडणवीस सरकार अलर्ट मोडवर काम करत आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणासाठी तीन महत्वपूर्ण घोषणा केल्या.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील गोळीबार मैदानावर ५ मार्चला सभा घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० आमदार तसेच भाजपवर साडकून टीका केली होती. तेव्हाच शिंदे गटाच्या वतीने आम्ही १९ मार्चला याच मैदानात सभा घेऊन उत्तर देऊ, असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आजच्या सभेत गोळीबार मैदानातून मुख्यमंत्री शिंदे काय बोलणार, कोणावर फायरिंग करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. तसेच कोकणासाठी कोणत्या घोषणा करणार याकडेही लक्ष लागले होते.

Eknath Shinde : गळ्यात गळे घालणारे तुमचा गळा कधी कापतील कळणार देखील नाही

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या गद्दार आणि खोके हे दोनच शब्द आहेत. त्यामुळे ते त्याचेच तुणतुणे वाजवणार आहे. राज्यात येणाऱ्या काळात ते आदळआपट करत राहतील. फक्त जागा बदलत राहतील. त्यांच्याकडे दुसरे काही नाही. आम्ही मात्र, विकासकामे करत राहू, आज आम्ही कोकणाला पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळे लोकांना कळते कोण काम करते, कोण नुसतेच तोंडाचे बुडबुडे करते. म्हणूनच आज हा जनसागर येथे एकवटले आहे.

आमचे लोकं जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की दरवाजे उघडे आहेत. तुम्ही चालते व्हा. अशी वागणूक देत असेल तर कोण त्यांच्याकडे थांबणार आहे. तुम्ही दरवाजा उघडाच ठेवा. कोणीच उरणार आहे. केवळ हम दो हमारे दो, असे म्हणत केवळ तुमचं कुटुंबच उरणार आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

Tags

follow us