अहमदनगर : लोकसभा निवडणुकांना आता सहा महिन्यांपेक्षाही कमी कालावधी बाकी आहे. या अनुषंगाने आता राजकीय नेतेमंडळी, इच्छुक उमेदवार आणि पक्षाचे संभाव्य उमेदवार सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिर्डीतून (Shirdi) लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानले जाणारे भाऊसाहेब वाकचौरेही (Bhausaheb Wakchoure) सक्रिय होत असल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा समोर घेत त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या विजेच्या आणि पाण्याच्या, शेतीच्या समस्यांसाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवेल आहे. (Former MP Bhausaheb Wakchoure wrote a letter to the CM Eknath Shinde and raised issue of the farmers)
शिर्डी लोकसभेसाठी आतापासूनच राजकीय मंडळींकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. यातच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत आणि शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या बंडखोरीची संधी साधून भाऊसाहेब वाकचौरे यांनी काही दिवसांपूर्वी घरवापसी केली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा 2009 साली अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. राखीव मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत वाकचौरे यांनी काँग्रेस आघाडीचे रामदास आठवले यांचा पराभव करत खासदारकी मिळवली होती.
2014 साली शिवसेनेकडून दुसऱ्यांदा अधिकृत उमेदवारी मिळाल्यांनतरही वाकचौरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण तिथे त्यांना सदाशिव लोखंडेंकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी अपक्ष अर्ज भरला, मात्र त्यांना अवघी 35 हजार मते मिळाली. गतवर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली, त्यांच्यासोबत शिर्डीचे खासदार लोखंडे यांनीही जाणे पसंत केले. त्यानंतर राजकीय गणित जळवून वाकचौरे पुन्हा सेनेत आले.
आता लोकसभेला ठाकरे गटाकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी जनतेच्या समस्या हाती घेतल्या आहेत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेती करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खंडित वीजपुरवठा, पाण्याचा प्रश्न, दुष्काळजन्य परिस्थिती यामुळे बळीराजा त्रासला आहे. यातच अतिरिक्त वीजबिल यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
जिल्ह्याच्या उत्तरेकडे असलेले धरण, नदी आणि पाटांनी वाहणारे पाणी ही मोठी देणगी असली, तरी विजेचा लपंडाव, रात्रीची वीज, श्वापदांची भीती, बिघडलेले ट्रान्सफॉर्मर आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. समस्यांचा पाढाच वाकचौरे यांनी वाचून काढत थेट वीज वितरंणाचे वाभाडेच काढले. यात तातडीने सुधारणा व्हावी अशी मागणी यावेळी वाकचौरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.