Four Naxalites Killed In Gadchiroli: गडचिरोलीत (Gadchiroli) भीषण चकमक झाली आहे. 25 ऑगस्ट 2025 रोजी गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात सुमारे आठ तास चाललेल्या चकमकीनंतर 4 जहाल माओवादी (1 पुरुष आणि 3 महिला) ठार (Naxalites Killed) झाले आहेत. घटनास्थळावरून आधुनिक शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे.
गुप्त माहितीवरून…
गडचिरोली विभागातील गट्टा दलम, कंपनी क्रमांक 10 आणि इतर माओवादी दबा धरून बसल्याची विश्वासार्ह गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली C-60 च्या 19 पथकांबरोबरच CRPF QAT ची 2 पथके कोपर्शी जंगल परिसरात रवाना करण्यात आली.
चलो मुंबई म्हणत जरांगे पाटलांची आर-पारची लढाई; वाचा, काय आहे मराठा आरक्षण प्रश्नाचा इतिहास?
पावसातही मोहीम थांबली नाही
या भागात दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे हालअपेष्टा सहन करत पथके जंगल परिसरात पोहोचली. सकाळी शोधमोहीम सुरू असतानाच माओवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी देखील तातडीने प्रभावी प्रत्युत्तर दिले.
आठ तासांची रक्तरंजित चकमक
सुमारे आठ तास सुरू असलेल्या या चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम हाती घेतली असता, 4 माओवादी ठार झाल्याचे निष्पन्न झाले. ठार झालेल्यांमध्ये 1 पुरुष व 3 महिला माओवादी यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून 1 SLR रायफल, 2 INSAS रायफल्स, 1 .303 रायफल जप्त करण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया
या कारवाईबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. गडचिरोलीतील कोपर्शी जंगल परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 माओवादी ठार केले. माओवाद्यांविरोधातील मोहीम अजूनही सुरू असून उर्वरित माओवादी शोधले जात आहेत, या भागात उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी माओवाद विरोधी अभियान सुरू असल्याचं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.