भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ माजली आहे. (Kharat) कित्येक महिलांवर लैंगिक अत्याचार, बलात्कार केल्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाने आता राजकीय वर्तुळात देखील मोठी खळबळ उडाली आहे. भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पडळकरांच्या मते, जयंत पाटील यांनी अशोक खरातशी निकटचे संबंध ठेवले होते आणि त्याला विविध प्रकारे मदत केली होती.
जयंत पाटील आपल्या मुलासोबत मिरगाव येथे खरातकडे गेले होते. तेथे त्यांनी रक्ताची अंघोळ केल्याचा दावा पडळकरांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल पोलीस चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी अशोक खरातला ईश्वरपूर येथे आणले होते. तेथे खरातने काय कार्यक्रम केले, याचीही चौकशी व्हावी, असे पडळकर म्हणतात.
भोंदूबाबा खरात प्रकरणातील मंत्री, अधिकारी यांना सहआरोपी करा; विजय वडेट्टीवर यांची विधानसभेत मागणी
खरातच्या घर आणि संस्थेला दारणा धरणातून ४० किलोमीटर लांबीची पाईपलाइन आणि पाणी देण्यात आले. जयंत पाटील तेव्हा जलसंपदा मंत्री होते. त्यामुळे या निर्णयामागे त्यांची भूमिका तपासावी, अशी मागणी पडळकरांनी केली आहे. पडळकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, “भोंदू बाबाचा सगळा चांगला कार्यक्रम हा मुख्यमंत्री यांनी केला आहे”, पण जयंत पाटील यांनी खरातकडे जाऊन काय केले, याची माहिती समोर यायला हवी. तसेच जयंत पाटील यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली.
नेमकं प्रकरण काय?
अशोक खरातवर लैंगिक अत्याचार, भोंदूगिरी आणि महिलांचा छळ यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला अटक झाल्यानंतर त्याचे राजकीय आणि प्रशासकीय कनेक्शन्स समोर येत आहेत. यापूर्वी खरातच्या कार्यक्रमांना अनेक नेत्यांनी हजेरी लावल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता गोपिचंद पडळकर यांच्या आरोपांमुळे जयंत पाटील यांच्याही नावाने चर्चा सुरू झाली आहे.
भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी केलेल्या या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची SIT किंवा पोलीस स्तरावर सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जयंत पाटील यांच्याकडून या आरोपांना अद्याप प्रत्युत्तर मिळालेले नाही. हे आरोप खरे ठरले तर खरात प्रकरण आणखी मोठ्या राजकीय भूकंपाचे कारण ठरू शकते. सध्या प्रकरण तापलेले असून, सर्वांच्या नजरा पोलीस तपास आणि नेत्यांच्या प्रतिक्रियांकडे लागल्या आहेत.
