Maharashtra Gram Panchayat Election Result Update : आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी आज (दि.6) हाती येणाऱ्या 2 हजार 300 ग्रामपंचायतींच्या निकालाकडे (Maharashtra Gram panchayat Election Result) सर्वांचे लक्ष लागले असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यातील प्रमुख ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असल्याचे चित्र समोर आले आहे. तर, आमदार रोहित पवार (Rohit Pawar), खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe), डॉ.संजय कुटे, शहाजी बापू पाटील या प्रस्थापितांना त्यांच्या मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. नेमका राज्यातील ग्रामपंचायतींच्या निकालात कोणचा पराभव झाला कोणाचा विजय झाला हे सांगणारा लाईव्ह ब्लॉग…
अहमदनगरः महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील गटाचे राहाता तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींवर वर्चस्व. पण पुणतांबा, वाकडी, चितळी ग्रामपंचायती भाजपचे विवेक कोल्हे गटाने हिसकावल्या. महत्त्वाच्या गावांमध्येही कोल्हेंचा शिरकाव.
तेलंगणाच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने दहा ग्रामपंचायती जिंकत महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री केली आहे. भंडाऱ्यातील नऊ ग्रामपंचायतीवर बीआरएसने झेंड फडकावला आहे. विदर्भबरोबर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील रेवकी ग्रामपंचायतही जिंकली आहे.
काटेबाम्हणी, उसरा, सालई बु, धुसाळा या भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत बीआरएसचे सरपंच झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. अजित पवार गट आणि शरद पवार गटालाही इथे चांगलाच धक्का बसलाय. या दोन्ही गटाला मागे टाकत काँग्रेसने तीन जागांवर बाजी मारली आहे. तर मनसेने दोन जागांवर खाते उघडले आहे. यात विशेष गोष्ट म्हणजे इतर सर्व पक्षांना मागे टाकत चार अपक्ष उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले आहेत.
निवडून आलेले सरपंच
1 ओंडली - प्रकाश वाळू खडके - शिंदे गट
2 दौडत - पांडू मामा शिंदे - काँग्रेस
3 कृष्ण नगर - वैशाली सचिन आंबावणे - अपक्ष
4 कुशेगाव- एकनाथ गुलाब कातोरे - अपक्ष
5 मोगरे - प्रताब विठ्ठल जाखेरे - मनसे
6 लक्ष्मी नगर - सावित्री सोमनाथ जोशी - ठाकरे गट
7 घोटी खुर्द - माणिक निवृत्ती बिन्नर - काँग्रेस (पोट निवडणूक)
8 आडवंन - निकिता किशोर आघान - काँग्रेस
9 धारगाव - रेश्मा पांडुरंग पुंजरा - अपक्ष
10 नागोसली - काशिनाथ साखरू होले - शिंदे गट
11 उंबरकोन - आत्मराम नामदेव सारुकते - अपक्ष
12 सोमज - जिजाबाई काशिनाथ कुंदे - मनसे
13 टाकी घोटी - माधुरी आडोळे - ठाकरे गट
14 शिरसाठे - सुनीता दत्तू सदगीर - शरद पवार गट
15 मोडाळे - शिल्पा दत्तू आहेर - अजित पवार गट
16 नांदगाव सदो - अनिता राक्षे - ठाकरे गट (बिनविरोध)
बारामतीमधील काटेवाडीत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अजितदादा गटाला मोठं यश मिळालं आहे. काटेवाडीमध्ये अजित पवार गटाला 13 जागा मिळाल्या आहेत. एका जागेवर अपक्ष आणि दुसऱ्या एका जागेवर भाजपला यश मिळालं आहे. तसेच अजित पवार गटाचा सरपंच विजयी झाला आहे.
जळगावात ग्रामपंचायत निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे वर्चस्व राखण्यात यश आले असून, जळगाव ग्रामीण मतदारसंघात 32 पैकी 28 जागांवर शिंदे गटाची सत्ता आली आहे. तर पाळधी या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मूळगाव असलेल्या पाळधी गावच्या ग्रामपंचायतीवर गुलाबराव पाटील यांचे समर्थक विजय रूपसिंग पाटील सरपंच पदी विराजमान झाले आहेत.
भोरमध्ये 27 पैकी 14 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या होत्या तर 13 ग्राम पंचायतींसाठी ही निवडणूक पार पडली होती. भोरमध्ये काँग्रेस आमदार आमदार संग्राम थोपटे यांचं वर्चस्व कायम राहिले असून, एकूण 27 ग्रामपंचायतींच्या निकालात काँग्रेसला 22, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 01, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 02, शिवसेना ठाकरे गटाला एका जागेवर विजय मिळाला आहे.
आटपाडी तालुक्यातील 9 ग्रामपंचायतीवर आमदार गोपीचंद पडळकर म्हणजेच भाजपची एकहाती सत्ता. तालुक्यातील करगणी, नेलकरंजी या मोठ्या ग्रामपंचायतवर भाजपाचा झेंडा याशिवाय करगणी, मानेवाडी, वाक्षेवाडी, कानकात्रेवाडी, चिंचाळे, आंबेवाडी, मिटकी, काळेवाडी या ग्रामपंचायतींवरदेखील भाजपचा विजय झाला आहे. तर, शिवसेनेचा विभुतवाडी, मासाळवाडी, निंबवडे, पिंपरी खुर्द तर, अमरसिंह देशमुख गटाने बनपुरी ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे.
नगर जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी पार पडली. यातच जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू मानला जाणारा तालुका संगमनेरमधील आश्वी खुर्द ग्रामपंचायतीवर विखे पाटील गटाने सत्ता काबीज केली आहे. विखे पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे राहाता तालुक्यातील वाकडी ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल लागला आहे. वाकडी ग्रामपंचायतीत सत्तांत्तर झाले असून विखे पाटील गटाला या ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपचे विवेक कोल्हे गटाचा विजय झाला असून सरपंचपदी रोहिणी बाळासाहेब आहेर यांचा विजय झाला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुळगाव असलेल्या काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निकालाकडे आज सर्व राज्याचे लक्ष लागल आहे. येथे 16 जागांसाठी मतदान पार पडलं असून काटेवाडी ग्रामपंचायत अजित पवारांना की शरद पवारांना कौल देते. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
याआधी काटेवाडी गावात गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. मात्र, राष्ट्रवादी आणि शरद पवारांशी बंड करून भाजपची युती केलेल्या अजित पवार गटाचे वर्चस्व या निवडणुकीमध्ये दिसत असून तेरा जागांवर अजित पवार गटाने मुसंडी घेतली आहे
रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांच्या रावेर येथे 13 पैकी सात ग्रामपंचायतीवर भाजाने वर्चस्व कायम ठेवत आहे. एक प्रकारे भाजपाच्या रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसेंनाच धक्का दिला आहे.