Rais Shaikh On Hindi Language : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीवरुन राजकारण चांगलेच तापले असून विरोधक या मुद्यावरुन महायुती (Mahayuti) सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. तसेच सरकारने विद्यार्थ्यांवर पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी करत आहे. तर आता या मुद्यावरुन समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख (Rais Shaikh) यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे.
इयत्ता पहिली ते चौथी पर्यंच्या विद्यार्थ्यांना दोनपेक्षा अधिक भाषा शिकणे दडपणाचे आहे, असा तज्ज्ञांचा दावा असून महायुती सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून हिंदी या तिसऱ्या भाषेची केलेली सक्ती गैर आहे. त्याला विरोध असून 5 जुलै रोजी मराठीसाठी मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
माध्यमांशी बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, हिंदी भाषेला समाजवादी पक्षाचा विरोधी नाही. राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये मराठी व इंग्रजी या पहिलीपासूनच्या सक्तीच्या दोन भाषा आहेत. आता त्यात हिंदी या तिसऱ्या भाषेची महायुती सरकारने सक्ती लादली आहे. पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला आपला विरोध आहे. मात्र जर सरकारला हिंदी भाषा प्रस्तावित करायची असल्यास ती इयत्ता पाचवी पासून करण्यात यावी, अशी आपली मागणी आहे. असं माध्यमांशी बोलताना आमदार रईस शेख म्हणाले.
तिकीट बुकिंगपासून ते एटीएमपर्यंत 1 जुलैपासून 4 मोठे नियम बदलणार; जाणून घ्या सर्वकाही
ते पुढे म्हणाले की, यासंदर्भात समाजवादी पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. तिसरी भाषा लादण्याचा संघ आणि भाजपचा अजेंडा आहे. विरोधी पक्षांनी राज्यात हिंदीची पहिलीपासून सक्ती करण्याच्या विरोधात ठाम भूमिका घेतली आहे. त्याला आपला पाठिंबा आहे. त्यामुळे 5 जुलै रोजी होणाऱ्या मराठी भाषेसाठीच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आमदार रईस शेख यांनी सांगितले.