हिंदी सक्तीचे निर्णय रद्द झाल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “एकजुटीचा धसका..”

हिंदी सक्तीचे निर्णय रद्द झाल्यानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “एकजुटीचा धसका..”

Raj Thackeray on Hindi Language Row : राज्यात हिंदी भाषा सक्तीला विरोध वाढत चाललेला असतानाच आज महायुती सरकारने हिंदी भाषेसंदर्भातील (Hindi Language Row) दोन्ही शासन निर्णय रद्द केले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला (Monsoon Session) आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) ही घोषणा केली. या निर्णयानंतर हिंदी विरोधातील आंदोलनात आघाडीवर असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मराठी जनतेच्या रेट्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरेंची प्रतिक्रिया जशीच्या तशी..

इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील दोन जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही. कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता? हे मात्र अजून गूढच आहे.

पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल 2025 पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायचा ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.

Video : मोठी बातमी! पहिलीपासून हिंदीसक्ती अखेर रद्द; जनमतापुढे फडणवीस सरकार नमले

अजून एक गोष्ट सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतु हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत. ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी. हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी.

आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाही. त्यांना कुणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे. असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा.

तुम्ही ठाकरे बंधुंच्या मोर्चात सहभागी होणार का? गुगली प्रश्नावर अजितदादांचं खास उत्तर म्हणाले, “मोर्चाची वेळ..”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube