MNS Morcha : हिंदी सक्तीच्या धोरणाला विरोध म्हणून मनसेने येत्या 5 जुलै रोजी मुंबईत विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चामध्ये समस्त मराठी माणसांनी सहभागी व्हावं, असे आवाहन मनसेतर्फे करण्यात आलं आहे. (Morcha) उद्या मनसेकडून एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे 29 जुलै रोजीच शाखाप्रमुखांना महत्त्वाचं मार्गदर्शन करणार आहेत.
हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात 5 जुलै रोजी मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाच्या नियोजनासंदर्भात मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उद्या (29 जून) बैठक होणार आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता मुंबईतील राजगड या मनसे पक्षाच्या कार्यालयात होणार आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे या बैठकीला उपस्थित असतील. त्याचवेळी दुसरीकडं कल्याणमध्ये हिंदी सक्तीविरोधात ठाकरे गट व मनसे एकत्र आले आहेत.
अ. भा. मराठी साहित्य महामंडळ 5 जुलैच्या मोर्चात सहभागी होणार, महामंडळाच्या अध्यक्षांची माहिती
उद्या (29 जून) कल्याणमध्ये हिंदी सक्तीच्या परिपत्रकांची होळी करण्यासाठी एकत्र बैठकीचे नियोजन करण्यात आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे बाळा परब आणि मनसेचे प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वात उद्याच्या आंदोलनाच्या तयारीसाठी कल्याण शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीस दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याआधी डोंबिवलीत पलावा पुलप्रश्नीही ठाकरे व मनसे दोघे पक्ष एकत्र आले होते.
या बैठकीत उद्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी तीन वाजता हिंदी सक्तीबाबतच्या शासनाच्या परिपत्रकाची होळी करत करणार आंदोलन करण्याचं ठरवण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी हिंदी सक्तीच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघा बंधूंमध्ये निर्माण होत असलेल्या जवळीकीचे विवेचन केले आहे. महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून ठाकरे हा एक ब्रँड आहे आणि दोन्ही ठाकरे एकत्र झाले तर ते एक शक्ती आहेत असं ते म्हणाले आहेत.
महाराष्ट्रामध्ये सध्या सक्षम विरोधी पक्ष असण्याची गरज आहे. सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी हे दोन्ही ठाकरे एकत्र आले तर विरोधी पक्षाचे बळ एकवटेल. संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेस जशी मुंबई वाचवण्याचा प्रयत्न केला गेला त्याप्रमाणे मुंबई अडचणीत आहे. केवळ भाषिक प्रश्नामुळे नव्हे तर मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि ते वाचली पाहिजे, असे थेट मत उन्हाळे यांनी व्यक्त केले.