याला-त्याला टार्गेट केल्याने वंजारी, माळी, तेली (Jarange Patil) असा ओबीसी वर्ग मराठ्यांच्या विरोधात गेला. आता हे कधीपर्यंत चालणार, असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना विचारला. त्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “जातीचं वाटोळं होऊ द्यायचं का? बावनकुळेंनी पत्र नसतं काढलं, तर मी बोललो नसतो. यावेळी मी मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना काही बोललो नाही. पण जो याच्यामध्ये खोड करणार, त्याला मी बोलणार नाही तर कसं?” असा उलट प्रश्न जरांगे पाटील यांनी यावेळी केला आहे. ते ‘लेट्सअप मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
जी प्रमाणपत्रं रद्द झाली, ती विद्यार्थ्यांची नव्हती, ती राजकीय लोकांची होती, यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “मग मीडिया ट्रायल कशाला घेतली? तुम्ही हमी दिली का? हे विद्यार्थ्यांच्या विरोधात नाही, हे राजकीय लोकांसाठी आहे, असं हे अजिबात म्हणाले नाहीत.” तसंच, त्यांच्या या पत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि मराठा समाजात गैरसमज निर्माण झाला. त्यामुळे मी बोललो, आक्रमक झालो, असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
फडणवीस-शिंदेंसह बावनकुळेंवर जरांगेंचा निशाणा; ‘मराठा-ओबीसींमध्ये जाणीवपूर्वक दुही निर्माण केली जाते’
प्रसाद लाड आणि तुमचं इतकं कसं जमतं, असा प्रश्न विचारल्यावर जरांगे पाटील म्हणाले, “त्याचं आणि माझं काय प्रेमसंबंध नाहीत. तो आम्हाला काहीतरी मिळालं पाहिजे, यासाठी पळापळ करतोय, म्हणून आमचं जमतंय.” त्याचबरोबर, “मी पहिला माणूस आहे, मंत्री बावनकुळे यांचं कौतुक करणारा. पण आमच्या मुलांचं काही नुकसान होणार असेल, तर आम्ही कसं सहन करणार?” असं म्हणत आपण विनाकारण बावनकुळे यांना बोललो नाही, असंही जरांगे पाटील म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात जरांगे पाटलांच्या मागण्या वारंवार बदलतात का, यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “मी सरसकट आरक्षणाच्या बाजूनेच चाललोय. एकदाच एक भाकर खाण्याऐवजी तुकडे-तुकडे खातोय. आणि मी जे काही हळूहळू चाललो, ते समाजालाही मान्य आहे.” तसंच, पश्चिम महाराष्ट्र हा भाग संपन्न असला तरी त्या लोकांना कळलंय की, जरांगे पाटील जे मागतोय ते योग्य आहे. आपल्यालाही त्याच मार्गाने जावं लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
तुम्ही जो आक्षेप घेतला, त्यानंतर सर्वांना प्रमाणपत्र मिळाले का, असा प्रश्न विचारला असता, ते द्यावेच लागणार, असं जरांगे पाटील म्हणाले. “माझ्या मुलाला भेटायला आलेल्या नेत्यांनी माझ्या समाजाला काही अडचणीचं होईल, असं वागल्यावर मी त्याला कसं चांगलं म्हणू? कितीही भेटले आणि बोलले तरी समाजावर जेव्हा येईल, तेव्हा मी कायम समाजाच्या बाजूने असणार,” असं म्हणत आपण कायम अमरत्व असणाऱ्या समाजासोबत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. तसंच, एकनाथ शिंदे यांच्याकडून तर ही अपेक्षाच नव्हती. त्या मंत्री शिरसाटच्या नादी लागून शिंदे साहेबांनी मोठा तळतळाट घेतला, असा संताप जरांगे पाटलांनी यावेळी व्यक्त केला.
