Download App

जयदीप कुटुंबाला भेटण्यासाठी आला अन् अलगद अडकला… पत्नीनेच पोलिसांना दिली टीप?

जयदीप आपटेच्या शोधासाठी सात पथकांकडून शोध मोहिम सुरू होती, अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Kalyan News : मालवणमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue ) कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला (Jayadeep Apte) पोलिसांनी अटक केली. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांपासून जयदीप फरार होता. अखेर जयदीपला त्याच्या कल्याणमधील घरातून पोलिसांनी अटक केली. जयदीपच्या शोधासाठी सात पथकांकडून शोध मोहिम सुरू होती, अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आता हा जयदीप आपटे पोलिसांच्या जाळ्यात आला तरी कसा याचीही माहिती समोर आली आहे. अंधाराचा फायदा घेत कुटुंबियांना भेटण्यासाठी कल्याण येथील त्याच्या राहत्या घरी आला होता. याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली.

मोठी बातमी! शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला अटक

जयदीप आपटे या घटनेनंतर फरार झाला होता. पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात होता. त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. विरोधकांकडून मात्र राज्य सरकारला धारेवर धरले जात होते. राज्य सरकारनेच जयदीपला लपवून ठेवल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे पोलिसांकडून शोध मोहिमेला गती दिली होती. या घटनेनंतर जयदीप आपटेचे कुटुंबीय शहापूरला नातेवाईकांकडे गेले होते. पोलिसांनी तिथे जाऊन जयदीपची पत्नी आणि आईची चौकशी केली होती. त्यानंतर जयदीपचे कुटुंबीय पुन्हा कल्याणला आले होते.

पत्नीने का दिली पोलिसांना माहिती ?

दरम्यान, जयदीपच्या पत्नीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आपटेला अटक केल्याचे सांगितले जात आहे. आपटेचे कुटुंबीय आणि नातेवाईक त्याला आत्मसमर्पण करण्यासाठी समजावत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपटेने पत्नीशी संपर्क करून घरी परत येणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर पत्नीने ही माहिती पोलिसांना दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पोलिसांना जयदीपला अटक करता आली.

जयदीप विरोधात लूक आऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. त्यामुळे तो कुठेही लपला तरी फार काळ पोलिसांच्या नजरेपासून वाचणार नव्हताच. जयदीप आपटे रात्रीच्या सुमारास कुटुंबियांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्याला अटक करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली. एक पथक कल्याण रेल्वे स्टेशनवर तैनात करण्यात आले. तर दुसरे पथक त्याच्या राहत्या घराच्या परिसरात दबा धरून बसले होते. आपटे इमारतीच्या परिसरात येताच रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्याला पोलिसांनी अटक केली. नंतर त्याला डीसीपी ऑफिसमध्ये आणण्यात आले. या ठिकाणी त्याची चौकशी करण्यात आली. नंतर त्याला सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मोठी बातमी! मालवण राड्या प्रकरणी ४२ जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांची कारवाई

दरम्यान, जयदीप आपटेला पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही तर त्याने स्वतःच आत्मसमर्पण केल्याचा दावा जयदीप आपटेच्या वकिलांनी केला आहे. जयदीप अंधाराचा फायदा घेत आला आणि पोलिसांनी त्याला पकडलं हे जे सांगण्यात येत आहे ते खोटं आहे. काही जणांकडून या मुद्द्यावर राजकारण केले जात असल्याचा दावा वकिलांनी केला आहे.

follow us