Download App

उद्धव ठाकरेंचे आदेश, दोघंही तातडीने मुंबईला या! खैरे-दानवेंचा वाद मिटणार की वाढणार?

Lok Sabha Election 2024 Maharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमधील बहुतांश आमदार शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरेंच्या अडचणी आधीच वाढल्या होत्या. त्यात माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील (Ambadas Danve) वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आला. या वादामुळे उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) चांगलीच कोंडी झाली आहे. दोघांतील वाद आणखी वाढू नये यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यासाठीच या दोन्ही नेत्यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आले आहे. आज दुपारी मातोश्री येथे दोन्ही नेत्यांची उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बैठक होणार आहे.

“लोकसभा माझ्या नशिबात, डावललं असतं तर इथपर्यंत आले नसते” खैरेंचा दानवेंना टोला

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनाच (Chandrakant Khaire) पुन्हा उमेदवारी देण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी प्रचाराचा नारळही फोडला. या घडामोडींवरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज (Ambadas Danve) झाले होते. तशा चर्चा सुरू झाल्या. येत्या एक ते दोन दिवसांत दानवे शिंदे गटात प्रवेश करतील असेही बोलले जाऊ लागले. राज्याच्या राजकारणात आज सकाळपासून याच घडामोडीची चर्चा आहे.

मात्र, या चर्चांवर स्वतः अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत पूर्णविराम दिला. मी नाराज असल्याच्या चर्चांत काहीच अर्थ नाही. शिंदेंची शिवसेना फक्त पाच दिवसांची आहे. मी ठाकरेंसोबतच राहणार आहे, असे दानवे यांनी माध्यमांना कालच सांगितले होते. त्यानंतर दानवेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत खैरे यांनीही पलटवार केला होता. त्यांना डावललं असतं तर आज इथपर्यंत आले असते का? विरोधी पक्षनेत्यासारखं मोठं पद त्यांना दिलं आता दानवेंना आणखी काय पाहिजे, असे सवाल खैरे यांनी उपस्थित केले होते.

Chhatrapati Sambhajinagar : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा; अंबादास दानवे अन् संदिपान भुमरे भिडले

या घडामोडींनंतर ठाकरे गटाच्याही अडचणी वाढल्या होत्या. दोघांतील वाद अधिक वाढू नये यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या. हे दोन्ही नेते आज दुपारी 12 वाजल्यानंतर मुंबईत पोहोचतील. त्यानंतर उद्धव ठाकरे या दोघांतील वाद मिटवण्याचा प्रयत्न करतील. आता स्वतः उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर तरी दोघांतील वाद मिटणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us