Download App

Father’s Day : ठाकरे, पवार अन् फडणवीस, राजकारण गाजवणारी ‘बाप’ माणसं

राजकारणात घराणेशाही असल्याचा मुद्दा नेहमीच उपस्थित केला जातो. नव्हे भारतीय राजकारण बऱ्याचदा याच मुद्द्याभोवती फिरतं.

Indian Politics : सर्वसामान्य अगदी गरीबातला गरीब व्यक्ती असो किंवा एखादा उद्योजक आणि गर्भश्रीमंत राजकारणी. मुलं नेहमीच आपल्या माता पित्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन पुढं जाण्याचा प्रयत्न करतात. जीवनातलं कोणतंच क्षेत्र याला अपवाद नाही. राजकारणही नाही. राजकारणात घराणेशाही असल्याचा मुद्दा नेहमीच उपस्थित केला जातो. नव्हे भारतीय राजकारण बऱ्याचदा याच मुद्द्याभोवती फिरतं. पण राजकारणात असेही राजकारणी आहेत ज्यांच्या कुटुंबातील प्रत्येकानेच स्वकर्तुत्वाने आपला ठसा उमटवला. फादर्स डे (16 जून) च्या निमित्ताने भारतीय राजकारणातील अशाच यशस्वी पिता पुत्रांची माहिती घेऊ या..

बाळासाहेब ठाकरे-उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचं राजकारण आणि ठाकरे कुंटुंब हे अतूट समीकरण आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे देशातील प्रतिभावान नेत्यांत गणले जात होते. बाळासाहेबांचा दरारा अन् राजकारणातला त्यांचा दबदबा किती होता याचे अनेक किस्से मराठी माणसांना ठाऊक आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन करून राज्याच्या राजकारणात पदार्पण केलं. यानंतर निवडणुकीत त्यांना यश मिळत गेलं. त्यांच्यानंतर पुत्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची कमान आपल्या हाती घेतली. त्यांना बाळासाहेबांचं मार्गदर्शन मिळतच होतं. त्यांच्याच नेतृत्वात शिवसेना मुख्य प्रवाहातील राजकीय पक्ष बनला. त्यांच्या कार्यकाळात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आलं. या सरकारमध्ये उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते.

स्पीकर पदावर चंद्राबाबूंचा डोळा पण, 1999 चा ‘कटू’ अनुभव भाजप विसरणार का?

शरद पवार-सुप्रिया सुळे

राज्याच्या राजकारणातलं आणखी एक यशस्वी नाव म्हणजे शरद पवार. शरद पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेसपासून फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. यूपीए सरकारच्या काळात सलग दहा वर्षे केंद्रीय कृषिमंत्रीपद यशस्वीरित्या सांभाळलं. महाराष्ट्राच्या राजकारणाचं पान शरद पवार यांच्याशिवाय हलत नाही हे त्यांनी अनेकदा दाखवून दिलं आहे. शरद पवार यांच्याप्रमाणेच त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे देखील राजकारणात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्या पुन्हा बारामतीच्या खासदार म्हणून निवडून आल्या. खासदारकीच्या काळात त्यांनी केलेल्या कामांची दखल घेत त्यांना संसदरत्न पुरस्कारही मिळाला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात खुद्द शरद पवार यांनीच अनेकदा या गोष्टीचा उल्लेख करत खासदार सुप्रिया सुळे यांच्या कामाचं कौतुक केलं होतं.

गोपीनाथ मुंडे-पंकजा मुंडे

महाराष्ट्रात भाजपाला जनाधार मिळवून देण्याचं काम ज्या मोजक्या नेत्यांनी केलं त्यात स्व. गोपीनाथराव मुंडे यांचं नाव पहिल्यांदा घ्यावं लागेल. ज्यावेळी राज्यात भाजप औषधालाही नव्हता. त्याकाळात स्वतः गोपीनाथ मुडे, स्व. प्रमोद महाजन, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांसह अन्य नेत्यांनी भाजप राज्यात रुजवला. चार दशकांच्या मेहनतीनंतर आज भाजपने राज्यात मोठी मजल मारली आहे. सन 1995 मध्ये युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री राहिले. राजकारणात विरोधी पक्षातील नेत्यांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. पुढे गोपीनाथ मुंडे यांच्याच छत्रछायेखाली पंकजा मुंडे यांनी राजकारणाचे धडे गिरवले. भाजपमध्ये महत्वाच्या नेत्या म्हणून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. युती सरकारच्या काळात महिला बालविकास मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं.

नागपूरचे महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री

राज्याच्या राजकारणात सध्या उठून दिसणारं आणखी एक नाव आहे. ते म्हणज देवेंद्र गंगाधरराव फडणवीस. मागील तीस वर्षांपासून ते राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. वडिलांचा वारसा चालवत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पदं भूषवली. युती सरकारच्या काळात पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्रीही राहिले. आताच्या महायुती सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस भाजपातील आघाडीचे नेते होते. अनेक वर्ष विधानपरिषदेचे आमदार राहिले. आणीबाणीच्या काळात गंगाधरराव फडणवीस जनसंघाचे सदस्य होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळालं. नागपूर महापालिकेचे महापौर, आमदार पुढे 31 ऑक्टोबर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले.

लालू यादव-तेजस्वी-तेजप्रताप यादव

भारताच्या राजकारणात बिहारचं वेगळंच महत्व आहे. बिहारी राजकारणात नितीशकुमार जसे किंगमेकर ठरतात तसाच लालू प्रसाद यादव यांच्या उल्लेखाशिवाय येथील राजकीय वर्तुळ पूर्ण होत नाही. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रात रेल्वेमंत्री राहिलेल्या लालू यादव यांची मुलं तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव राजकारणात आहेत. तेजस्वी यादव आधीच्या महागठबंधनच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीही राहिले आहेत. आताच्या लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी अख्ख्या बिहारमध्ये झंझावाती प्रचार केला होता. दुसरीकडे त्यांचे बंधू तेजप्रताप यादव माजी आरोग्य मंत्री राहिले आहेत.

भाजपाचं पहिलं सरकार अन् पहिला पंतप्रधान; भाजपाच्या इतिहासातल्या गोष्टीही खास…

मुलायमसिंह यादव-अखिलेश यादव

उत्तर प्रदेशात वर्षानुवर्षे समाजवादी पार्टीचं वर्चस्व राहिलं आहे. मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांचं वलय येथील राजकारणात आहे. मुलायम सिंह यादव उत्तर प्रदेशचे तीनदा मुख्यमंत्री राहिले होते. तसेच केंद्र सरकारमध्ये त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून काम केलं आहे. अखिलेश यादव यांनीही वडिलांच्याच राजकारणातून धडे घेत 2012 मध्ये राज्याचं मुख्यमंत्रिपद मिळवलं. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. दुसरीकडे पिता पुत्राच्या संबंधात तणावाचेही प्रसंग घडले. 2016 मध्ये तर मुलायम सिंह यादव यांनी अखिलेश यांना पक्षातून काढून टाकले होते. नंतर मात्र त्यांनी हा निर्णय बदलला आणि अखिलेश यादव यांना पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं लागलं.

बिहारच्या राजकारणातलं आणखी एक मोठं नाव म्हणजे दिवंगत नेते रामविलास पासवान. अभिनय क्षेत्रात अपयश आल्यानंतर चिराग पासवान यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश केला. सन 2014 मध्ये लोक जनशक्ती पक्षाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढली. बिहारमधील जमुई लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले.

follow us