भाजपाचं पहिलं सरकार अन् पहिला पंतप्रधान; भाजपाच्या इतिहासातल्या गोष्टीही खास…

भाजपाचं पहिलं सरकार अन् पहिला पंतप्रधान; भाजपाच्या इतिहासातल्या गोष्टीही खास…

Lok Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदींनी सलग (PM Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं रेकॉर्ड तोडल आहे. या नंतर तीन दिवसांनी ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी प्रथमच भाजप नेत्याने शपथ घेतली आहे. आंध्र प्रदेशात एनडीएचे सहकारी चंद्राबाबू नायडू सुद्धा (Chandrababu Naidu) मुख्यमंत्री झाले आहेत. या दोन्ही राज्यात मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर एनडीएचे सरकार असणाऱ्या (NDA Government) राज्यांची संख्या 20 झाली आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की देशात भाजपचा पाहिला मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कोण होता, सुरुवातीला फक्त दोन खासदार असणारा भाजप लोकसभेत बहुमत मिळवण्यापर्यंत कसा पोहोचला..

सन 1977 मध्ये जनसंघाचे जनता पार्टीत विलीनीकरण करण्यात आले. परंतु वाद धुमसत होता. 1980 मध्ये जनसंघातून आलेल्या नेत्यांविरुद्ध दुहेरी सदयत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमोर एकतर जनता पार्टी सोडा किंवा संघाबरोबरील संबंध मिटवा अशी अट टाकण्यात आली. याचा विरोध करत जनसंघातून आलेल्या नेत्यांनी जनता पार्टी सोडली. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली.

सुनेत्रा पवार राज्यसभेवर… अजितदादांच्या डोक्यात ‘बारामती’चे लॉन्ग टर्म पॉलिटिक्स…

1984 मध्ये जिंकणारे भाजपचे दोन खासदार कोण?

भाजपचे पाहिले अध्यक्ष म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पक्षाला देशभरात ओळख मिळवून देण्यासाठी आणि काँग्रेसची एकाधिकार शाही संपवण्यासाठी मोठी मेहनत घेतली. यानंतर सन 1984 लोकसभा निवडणुका झाल्या. भाजपच्या या पहिल्याच निवडणुका होत्या. या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यावेळी काँग्रेस बद्दल सहानुभूतीची लाट होती. या लाटेत भाजपला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपने गुजरातमधील मेहसाणा आणि आंध्र प्रदेशातील हनामकोंडा या जागा जिंकल्या होत्या. गुजरातमधून ए के पटेल आणि आंध्र प्रदेशातून चंदूपतला जंगा रेड्डी भाजपचे पाहिले खासदार म्हणून निवडून आले होते.

दोन खासदार ते केंद्रात थेट बहुमत

यानंतर सन 1989 मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजपला 85 जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या पाठिंब्याने नॅशनल फ्रंटने सत्ता हाती घेतली. व्हीपी सिंह हे या सरकारचे पहिले गैर काँग्रेसी पंतप्रधान झाले. याच काळात भाजप नेत्यांनी बोफोर्स घोटाळ्याचा मुद्दा उचलून धरला. पुढे 1990 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या राम रथयात्रा काढली होती. त्यावेळी बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या आदेशाने रथयात्रा रोखून अडवाणी यांना अटक करण्यात आली. पुढे कार सेवकांनी ही रथयात्रा पूर्ण केली. याचा परिणाम 1991 मधील लोकसभा निवडणुकीत दिसून आला. भाजपने थेट 120 जागा जिंकल्या.

सहा जागा गमावल्या, मतं घटली तरीही भाजपला गुडन्यूज; बंगालच्या निवडणुकीत काय घडलं ?

देशातील पहिला भाजप पंतप्रधान कोण?

1996 च्या निवडणुकीत तर भाजपने 161 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली पण लोकसभेत बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे फक्त 13 दिवसात सरकार पडलं आणि वाजपेयींना राजीनामा द्यावा लागला.

सन 1998 मध्ये भाजपने एनडीएचे नेतृत्व करत लोकसभा निवडणुका लढल्या. तेलुगू देसम पक्षाने बाहेरून पाठिंबा दिला त्यामुळे वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले. पुढे 1999 मध्ये एआयएडीएमके पक्षाने सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पडले. पुढे 1999 मधील निवडणुकीत एन डी ए ने ए आय ए डी एम के ला बाजूला ठेवत 303 जागा जिंकल्या. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 183 जागा मिळाल्या होत्या. वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. यानंतर 2004 मध्ये वाजपेयींनी सहा महिने आधीच निवडणुकांची घोषणा केली.

या भाजपने इंडिया शायनिंग हा मुद्दा हाती घेतला होता. हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवून प्रचार केला. मात्र निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर सलग दोन टर्म काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए सरकार सत्तेत राहिले. 2014 मध्ये भाजपने काँग्रेसची सत्ता उखडून फेकत बहुमताने सरकार स्थापन केले. तेव्हापासून आतापर्यंत केंद्रात भाजपच्या नेतृत्वातील सरकार आहे.

केंद्रात किती वेळा भाजपचं सरकार

सन 1996 मध्ये पहिल्यांदा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान बनले होते. पण त्यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करता आलं नाही त्यामुळे फक्त 13 दिवसात सरकार पडलं. सन 1998 मध्ये वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. यावेळी 13 महिन्यानंतर सरकार पडले होते. 1999 मध्ये मात्र वाजपेयी बहुमताने पंतप्रधान बनले यावेळी त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपने बहुमत मिळवले. मोदींनी पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण केला.

मोदींच्या मंत्रिमंडळातले अनोळखी चेहरे; सर्वात श्रीमंत, प्रामाणिक खासदार बनले मंत्री

2019 च्या निवडणुकीत भाजपने 303 जागा जिंकत बहुमताने सरकार स्थापन केले नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण केला. आता 2024 मध्ये एनडीए सरकार असून नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. भाजपची स्थापना झाल्यापासून भाजप सरकारचा हा आतापर्यंतचा सहावा कार्यकाळ सुरू आहे.

भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर सर्वात आधी भाजपाला राजस्थानमध्ये सत्ता मिळाली होती. भैरो सिंह शेखावत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजपच्या आधी राजस्थानात जनता पार्टीचे सरकार होते. यानंतर नव्वदच्या दशकातच हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, हरयाणा आणि दिल्लीत भाजपाला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली.

किती राज्यात भाजप अन् मित्रपक्षांचं सरकार

आजमितीस देशातील 20 राज्यात भाजप आणि मित्र पक्षांचे सरकार आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गुजरात, हरयाणा, राजस्थान, छतीसगड, अरुणाचल प्रदेश, आसाम, ओडिशा, गोवा, बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, सिक्कीम, त्रिपुरा, मणिपूर, मेघालय, नागालँड, पुदुच्चेरी या राज्यांत भाजप आणि मित्र पक्षांचे सरकार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज