Download App

सावधान! आजपासून पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

Maharashtra Rain : हवामान विभागाने इशारा दिल्यानुसार कालपासून राज्यात मान्सून सक्रिय (Maharashtra Rain) झाला आहे. बुधवारी अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता आजपासून या पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणाबरोबरच कोल्हापूर, सातारा, सांगली परिसरातही पावसाचा (IMD Rain Alert) जोर वाढणार आहे. यासाठी हवामान विभागाने कोल्हापूर घाट परिसर आणि सांगलीला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

दक्षिण कोकणात उद्यापासून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो. दक्षिण कोकणाचा विचार केला तर या ठिकाणी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही उद्या अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मराठवाड्यात पावसापेक्षा वादळाचा कहर; शेतकऱ्यांसह काही ठिकाणी मानवी हानी

विदर्भात आज पावसाची बॅटिंग

विदर्भातही पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. येथील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह पाऊस होईल. वाऱ्यांचा वेगही ताशी 50 ते 60 किलोमीटर इतका असेल त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्याला पावसाने झोडपले

दरम्यान, काल राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. मराठवाड्यात पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप पहायला मिळाला. कालपासून छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह (Marathwada) मुसळधार पावसाने थैमान घातले. केळी व पपईच्या बागा आडव्या पडल्या, विजेचे १७ उपकेंद्रे आणि शेकडो वीजखांब कोसळले. शेतकरी उभ्या पिकांच्या नुकसानीने हताश, तर महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

लातूर शहरात मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडल्याने विजेचा खेळखंडोबा झाला. नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील महावितरण कंपनीचेही मोठे नुकसान झालं. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरात सिद्धार्थ उद्यानाची भींत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पावसामुळं प्रवेशद्वाराच्या भिंतीच काही भाग कोसळला आणि या घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर 5 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ज्या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे त्या उद्यानातील कर्मचारी होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं त्या ठिकाणी दाखल झाले होते.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! शाळेची वेळ बदलली, आता 7 ऐवजी केव्हा वाजणार घंटा?

follow us