छत्रपती संभाजीनगर : मराठ्यांच्या मुलांचं कल्याण न होऊ देण्याचं, त्यांना त्रास देण्याचं दोन-तीन ओबीसी (OBC) नेत्यांचं षडयंत्र आहे, यासाठी मराठा समाजातील नेत्यांनी पाठिशी खंबीर उभे रहावे. मराठा समाजातील नेत्यांनी ओबीसी नेत्यांचे हे षडयंत्र हाणून पाडावे, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले आहे. ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रुग्णालयातून उपचार घेताना बोलत होते. जरांगे यांनी या टिकेतून अप्रत्यक्षपणे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना लक्ष्य केले असल्याचे बोलले जाते. (Manoj Jarange indirectly targeted minister and OBC leader Chhagan Bhujbal)
छगन भुजबळ यांनी काल (6 नोव्हेंबर) बीड जिल्ह्याच्या दौरा केला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनात जाळण्यात आलेल्या नेत्यांच्या घराची आणि इतर नुकसानीचा आढावा घेतला. यानंतर ओबीसी नेत्यांनी भुजबळ यांच्या नेतृत्वात एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. सभा, आंदोलन, मोर्चा यासाठी तयारी सुरु केली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे दुकान उघडले आहे, अशी भूमिका घेत भुजबळ यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता भुजबळ यांच्या निशाणा साधला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांच्या मुलांचं कल्याण न होऊ देण्याचं, त्यांना त्रास देण्याचं दोन-तीन ओबीसी नेत्यांचं षडयंत्र आहे, यासाठी मराठा समाजातील नेत्यांनी पाठिशी खंबीर उभे रहावे. मराठा समाजातील नेत्यांनी ओबीसी नेत्यांचे हे षडयंत्र हाणून पाडावे. तुम्ही नाही भूमिका घेतली तरी मराठा समाज खंबीर आहे, मात्र याच मराठा तरुणांची तुम्हाला पुन्हा गरज लागणार आहे, पण आता मदत न केल्याने मराठा समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
बीडमध्ये ज्या घडामोडी घडल्या, त्या मराठा समाजातील तरुणांनी केलेल्या नाहीत. यांचेच काही तरी आपपासात झाले असावे, त्यातून या गोष्टी घडल्या. ती घरे, कार्यालय भुजबळांच्या नातेवाईकांनी फोडली असावीत, असा आरोप करत जरांगे पाटील यांनी मराठा तरूणांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातं आहे, असं मत व्यक्त केलं. ते पुढे म्हणाले, मराठ्यांच्या पोरांवर खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. विनाकारण अडकवलं जात आहे. ओबीसी नेत्यांकडून हे होत आहे, असेही ते म्हणाले.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे दुकान उघडले आहे, अशी भूमिका घेत छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. ते म्हणाले, खरोखरच कुणबीतून निजामकालीन पुरावे सापडले तर त्यांना ओबीसी प्रमाणपत्र द्या, यासाठी आमची हरकत नव्हती. पण आधी पाच हजार, मग दहा हजार, मग झाले पंधरा हजार आणि आता महाराष्ट्रभर होत आहे. म्हणजे समोरच्या दारातून प्रवेश मिळत नाही, म्हणून मागच्या दारातून ओबीसीमध्ये येण्याचा हा कार्यक्रम आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. पण वेगळं आरक्षण द्या, आमच्या आरक्षणात तुम्ही येऊ नका. कारण आमच्या जवळजवळ 375 जाती आणि 54 टक्क्यांपेक्षा जास्त लोक आहेत. त्यांच्या आरक्षणावर गदा येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.