Manoj Jarange : मराठा आरक्षणासंदर्भात विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषणाची सुरुवात केली आहे. आज या उपोषणाचा 15 वा दिवस असून आज (12 सप्टेंबर) या आंदोलनादर्भात मनोज जरांगे पाटील मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यांनी आज मराठा समाजाला अंतरवाली सराटीत येण्याचे आवाहन केले आहे. जरांगे पाटील आज मराठा समाजाची बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनाची तारीख जाहीर करण्याची शक्यता असल्याने आज अंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे सरकारकडून मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नाही असा आरोप जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. तसेच आता त्यांची आंदोलनाची पुढील दिशा अधिक आक्रमक असणार असा इशारा देखील जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. अंतरवाली सराटीत आज दुपारी होणाऱ्या बैठकीत मुंबईकडे (Mumbai) कूच करण्याच्या नियोजनाबाबत आणि पुढील रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीनंतर जरांगे पाटली मुंबई आंदोलनाची तारीख आणि पुढील कार्यक्रम जाहीर करणार आहे. तसेच जेव्हापर्यंत सरकार सर्व मागण्या मान्य करत नाही तेव्हापर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका देखील मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्याने राज्य सरकारच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
मोहम्मद सिराजकडे मोठी जबाबदारी; कर्णधार म्हणून निवड
मुंबई आंदोलनाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
तर मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती मात्र ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. मुंबईत येऊन शांततामय आंदोलन करण्यापासून रोखणारा प्रतिबंधात्मक आदेश देता येणार नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे असं देखील यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
