Download App

बारामतीचे रस्ते चकाचक पण बीडचे खड्डे कधी भरणार? शेतकरी पुत्राचा अजित पवारांना खडा सवाल…

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar in Beed : शरद पवारांची (Sharad Pawar) बीड जिल्ह्यात सभा झाल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून जोरदार तयारी देखील केली जाते. मात्र, या सभेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पुत्राने अजित पवारांनाच थेट बॅनरच्या माध्यमातून सवाल केले. बीड जिल्हा बारामतीसारखा जलसमृध्द कधी होणार? बारामतीचे रस्ते चकाचक झाले, बीडचे खड्डे कधी भरणार? असा थेट सवाल शेतकरी पुत्राने उपमुख्यमंत्र्यांना केला.

मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे. त्यात आता पावसाने दडी मारल्यानं बीड जिल्ह्यातील आठ लाखाच्या जवळपास क्षेत्र हे अडचणीत आलं आहे. त्यामुळं शेतकरी हताश झाला. 143 प्रकल्पांतील पाणीसाठी तळाला गेलाय. राज्यात बेरोजगाई, महागाई असे कितीतरी प्रश्न आहेत. मात्र, नेते मंडळी फक्त सभा आणि उत्तर सभा घेण्यातच मश्गुल आहेत, अशी जनभावना आहे. त्यामुळं आता अजित पवारांच्या सभेआधीच बीडमध्ये शेतकरी पुत्राने बॅनर लावत त्यांना काही प्रश्न विचारले आहेत. थेट उपमुख्यमंत्र्यांनाच बॅनरच्या माध्यमातून सवाल केल्यानं हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

कार्यकर्त्याचा मुलगा दुर्धर आजाराने ग्रस्त; गल्ली बोळातून वाट काढत राज ठाकरे चिमुकल्याच्या भेटीला 

शेतकरी पुत्राने हा बॅनर्स लावला. त्यात बीड जिल्हा बारामतीसारखा जलसमृद्ध कधी होणार? धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020 चा पीक विमा मिळाला, आमच्या शेतकऱ्यांना कधी मिळणार? गेल्या वर्षीचं अनुदान वाटप कधी? होणार असे प्रश्न विचारले.

याशिवाय, जिल्ह्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एखादे विद्यापीठ कधी? कामगारांना प्रमाणपत्र आणि मुलांसाठी शिष्यवृत्ती कधी? बारामतीचे रस्ते चकाचक झाले, बीडचे खड्डे कधी भरणार? असे सवाल विचारण्यात आलेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा बॅनर लागला आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील विकासकामे, दुष्काळी परिस्थिती, विविध प्रस्तावित जलप्रकल्प, वीजपुरवठा व वितरणाच्या इतर समस्या आदींबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रकल्प कोरडे पडत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. पाऊस नसल्यामुळं बळीराज संकटात आहे. पिकांना योग्य भाव नाही. रस्ते खराब आहेत. महागाई देखील वाढली. असे सगळे प्रश्न असतांना अजित पवार बीड दौऱ्यात बीड आणि मराठवाड्यासाठी काही घोषणा किंवा मदत करणार का? हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us